पुणे- करोना प्रतिबंधक लसीच्या लहान मुलांवरील सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या डोससाठी केंद्र सरकारकडून गाइडलाइन्स येतील. त्यानंतरच त्याची अंमलबजावणीचे नियोजन होईल. त्याला अजून किती वेळ लागेल हे सांगू शकत नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते गणेश बिडकर, राजेश पांडे उपस्थित होते. करोना काळात महापालिकेने केलेल्या उपाययोजना, सद्यस्थिती आणि लसीकरण मोहिमेबाबत डॉ. पवार यांनी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. त्या बैठकीत महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
महापालिकेने केलेल्या उपाययोजनांविषयी समाधान व्यक्त करत अन्य महापालिकांनीही यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. केंद्र सरकार या उपाययोजनांकडे लक्ष ठेवून आहे, नक्कीच केंद्राकडून मदत केली जाईल, असे आश्वासन डॉ. पवार यांनी दिले.
दुसरी लाट अद्यापही आहे. केरळ आणि महाराष्ट्रात अद्यापही रुग्णांची संख्या म्हणावी तेवढी आणि वेगाने कमी होताना दिसत नाही. जेथे अचानक जेथे केसेस वाढत आहेत तेथे केंद्रीय पथक जाते आणि तेथील आढावा घेऊन, सूचना करत आहे. तसेच ज्या-त्या राज्यातील परिस्थितीनुसार त्यांना गाइडलाइन्स लागू करण्यात येत आहेत. स्थानिक पातळीवर काळजी घेण्याची आणि आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे. उत्तरेकडच्या राज्यांमध्ये बाधितांचे प्रमाण कमी असल्याचे डॉ. पवार यांनी नमूद केले.
सतर्कता आवश्यकच
भारतात दुसरी लाट अद्यापही संपली नाही; अन्य अनेक देशांमध्ये तिसरी-चौथी लाट आल्याचे दिसून येत आहे. त्यादृष्टीने सतर्क राहणे आवश्यक आहे. केंद्र सरकार सातत्याने लक्ष ठेवून आहे. पंतप्रधान स्वत: याकडे लक्ष ठेवून आहेत आणि स्वत: व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका घेत असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.