कोंढवा –मंतरवाडी-कोंढवा बाह्यवळण मार्गावर मंतरवाडी, हांडेवाडी, उंड्री, पिसोळीदरम्यान जागोजागी रस्ता रुंदीकरण व कॉंक्रिटीकरण झालेले नाही, त्यातच विजेच्या खांबासह अन्य अडथळेही काढण्यात आले नाहीत. शासकीय विभागात समन्वयाचा अभाव असल्यास कामाची कशी “वाट’ लागते तसेच बांधकाम विभाग, महावितरण यांच्या कामाचा नमुना म्हणून या रस्त्याची नोंद व्हावी, अशी मागणी या परिसरातील लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी केली असून या “नमुना’ रस्त्याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना आमंत्रण देण्यात येणार आहे.
मंतरवाडी-कोंढवा रस्त्याने काम किती वर्षे सुरू असावे, याचे “रेकॉर्ड’ यापूर्वीच तोडले आहे. त्यातच काम सुरू असताना महावितरणने विजेचे खांब हटविणे गरजेचे असताना ते काढलेले नाहीत, रस्त्यालगत बहुतांशी ठिकाणी अतिक्रमणे तशीच आहेत. त्यातच रस्ता रुंदीकरणावेळी येणारे अडथळे बाजूला करणे बांधकाम विभागाने काम असताना त्यांनीही याकडे दुर्लक्ष करीत काम उरकून घेतले आहे.
सध्या, मंतरवाडी ते खडीमशीन चौक दरम्यानच्या या रस्त्याच्या एका चढावर मुरमाड टेमकाड तसेच आहे, तेथेच विजेचा खांब आहे.
या ठिकाणी रस्ते विभागाने रस्त्याचे काम केलेले नाही, या ठिकाणाहून एकच वाहन एकावेळी जाऊ शकते. अनेक विजेचे खांब वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत.