मुळशीतील उरवडे गावातील कंपनीला लागलेल्या आगीत पोटासाठी राबणाऱ्या
17 जीवांचा कोळसा झाला. या घटनेने सारा महाराष्ट्र हळहळला. परवाना वेगळ्या गोष्टीचा उत्पादन दुसरे असे प्रकार अन् कंपनीचा निष्काळजीपणा प्राथमिक तपासात पुढे येत आहे.
हा दुर्दैवी दशावताराचा वृत्तांत “प्रभात’च्या वाचकांसाठी…
पिरंगुट – उरवडे (ता. मुळशी) कंपनीतील आग दुर्घटनेत भालगुडी गावांतील 2 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे गावावर मोठी शोककळा पसरली आहे. गावातील एकूण 6 दररोज कंपनीत येत होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाले असून दोघांवर पुण्यातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर अन्य 2 जण किरकोळ जखमी झाले आहेत.
भालगुडी या गावातील एकूण सहा जण दररोज कंपनीत कामाला येत होते. यापैकी एकाच घरातील नवरा-बायको, दीर असे कुटुंबातील तीन सदस्य होते. यापैकी सुनीता राहुल साठे (वय 28) आणि अतुल बाळू साठे (वय 22) यांचा मृत्यू झाला आहे. तर संतोष सीताराम साठे (वय 24) व आदिनाथ महिपती साठे (वय 21) हे गंभीर जखमी असून पुण्यातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. राहुल सीताराम साठे (वय 30), सचिन भरत साठे (वय 24) हे जखमी असून घरी उपचार घेत आहेत.
सुनीता राहुल साठे आणि राहुल सीताराम साठे हे पती पत्नी आहेत. आग लागली त्यावेळी राहुल यांनी सुनीता यांना वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न केले होत; मात्र भीषण अग्नितांडवापुढे राहुल यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. तर राहुल यांचा सख्खा भाऊ संतोष सुदैवाने या घटनेत वाचला. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच हे दोघे सुखरूप बाहेर पडले.
घटनेच्या वेळी आदिनाथ हा कंपनीच्या बाथरूममध्ये अडकून पडला होता. त्यावेळी सचिन यांनी प्रसंगावधान राखून आदिनाथला बाहेर काढल्याने तोही या घटनेत बालबाल बचावला.
सुनीता यांच्यामागे पती, संस्कृती (वय 6) व आर्यन (वय 5) ही दोन लहान मुले, सासू-सासरे व दीर असा परिवार आहे. तर मृत अतुल साठे याच्या मागे आई, वडील, भाऊ, बहीण, आज्जी असा परिवार आहे.