मुळशीतील उरवडे गावातील कंपनीला लागलेल्या आगीत पोटासाठी राबणाऱ्या 17 जीवांचा कोळसा झाला. या घटनेने सारा महाराष्ट्र हळहळला. परवाना वेगळ्या गोष्टीचा उत्पादन दुसरे असे प्रकार अन् कंपनीचा निष्काळजीपणा प्राथमिक तपासात पुढे येत आहे.
हा दुर्दैवी दशावताराचा वृत्तांत “प्रभात’च्या वाचकांसाठी…
उरवडे येथील कांजनेनगर येथे राहणाऱ्या गीता दिवाडकर यांच्या पश्चात पती भारत, दोन मुले शुभम आणि मिलिंद आणि सासूबाई कलावती दिवाडकर असे कुटुंब आहे. 9 महिन्यांपूर्वीच गीता दिवाडकर कंपनीत कामाला लागल्या होत्या.
मुलांना चांगले शिक्षण घेता यावे म्हणून या कंपनीत त्या काम करत होत्या. दररोज त्यांचा मोठा मुलगा आईला कंपनीत सोडायला जायचा. घर ते कंपनी असा 3 ते 4 किमीचा प्रवासही त्या बऱ्याचदा पायी करायच्या, सोमवारी नेहमीप्रमाणे घरातील सगळी कामे आवरुन त्या कंपनीत निघाल्या आणि कधीही परत न येण्यासाठी.
आई गेली… असं म्हणत ती परत न येण्यासाठीच… असे म्हणत कुटुंबाला अश्रु अनावर झाले.