महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांचे संकल्पपत्राद्वारे आश्वासन
पुणे – मध्यवस्तीतून होणाऱ्या भुयारी मेट्रोमुळे विस्थापित होणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे पुनर्वसन केल्याशिवाय मेट्रोच्या स्टेशनचे उद्घाटन होणार नाही, असे आश्वासन पुणे लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी येथे स्पष्ट केले. त्याचबरोबर मेट्रोला कसब्यातून कुठल्याही नागरिकांचा विरोध नसून विरोधाच्या नावाखाली काहीजण राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोप सुद्धा यावेळी त्यांनी केला.
भारतीय जनता पक्षाच्यावतीने आज पुणे शहराचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली.यावेळी शहराध्यक्ष योगेश गोगावले, शिवसेनेच्या उपप्रमुख नीलम गोऱ्हे, महापौर मुक्ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ, आमदार मेधा कुलकर्णी, उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे, रिपाइंचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, शिवसेना शहराध्यक्ष महादेव बाबर उपस्थित होते.
स्मार्ट सिटीची अंमलबजावणी सुरू झाली असून त्याची सुरवात औंध व बाणेर येथून झाली असली, तरी शहर हेच स्मार्ट सिटीचे केंद्रबिंदू राहणार आहे. शहरात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी निधी उभारताना केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून बॉंड काढण्यात येणार आहेत, असेही बापट यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा हा संकल्पपत्र म्हणून प्रसिद्ध करण्यात आला आहे. या संकल्पपत्राबाबत माहिती देताना गोगावले म्हणाले, केंद्र आणि राज्याकडून मिळणारा निधी आणि पालिकेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या माध्यमातून अनेक योजना आगामी काळात राबविण्यात येणार आहेत. त्यात मेट्रोच्या पहिल्या तीन मार्गिकांचे काम वेळेत पूर्ण करणे, हायपरलूप प्रकल्प, लोणावळा ते दौंड नवीन रेल्वे मार्ग, याशिवाय पुणे शहराला 24 तास समान पाणीपुरवठा प्रकल्प नियोजित वेळापत्रकात पूर्ण करणार, भामा-आसखेड प्रकल्प यावर्षी कार्यान्वित करणार, शहरातील जुन्या नैसर्गिक जलस्रोतांची दुरुस्ती करुन पुनर्जीवन करणार असे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे या संकल्पपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
वैद्यकीय सुविधांसाठी सर्वांसाठी या धर्तींवर प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक रुग्णालय उभारण्यात येणार आहे. पालिकेच्या प्रस्तावित अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व नर्सिंग कॉलेजचे काम पूर्ण करणार, पुण्याची ओळख योगसिटी अशी व्हावी यासाठी योगविद्येच्या प्रचार व प्रसाराला प्राधान्य, ज्येष्ठ नागरिकांच्या उपचारांमध्येच विशेष सवलत देणार, डॉक्टरांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहेत. याशिवाय “सर्वांसाठी घरे’ योजनेची प्रभावी अमंलबजावणी करणार, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा कालबद्ध कार्यक्रम राबविणार अशा विविध उपक्रमांचे समावेश आहे.