पुणे (दिलीप राणे) –राज्यात सहकारात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या कॉसमॉस सहकारी बॅंकेत शारदा सहकारी बॅंकेचे लवकरच विलीनीकरण होणार आहे. शारदा सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाचा ठराव कॉसमॉस बॅंक व्यवस्थापनास प्राप्त झाला आहे.
येत्या गुरुवारी होणाऱ्या कॉसमॉस बॅंकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. या सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतर शारदा सहकारी बॅंकेचे कॉसमॉस बॅंकेत विलीनीकरण करण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
कॉसमॉस बॅंकेच्या आजमितीस 140 शाखा असून देशातील महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या सात राज्यांमध्ये बॅंकांचा शाखा विस्तार आहे.
शारदा सहकारी बॅंक विलीनीकरण झाल्यानंतर बॅंकेच्या आणखी शाखा वाढणार असून व्यवसाय वृद्धीसाठी बॅंकेस याची मदत होणार आहे. कॉसमॉस बॅंक ही सहकारातील राज्यातील तिसऱ्या क्रमांकाची बॅंक समजली जाते. बॅंकेचा 26 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय आहे.
कॉसमॉस बॅंकेचे 75 हजार सभासद आहेत. शारदा सहकारी बॅंकेचे विलीनीकरण झाल्यानंतरचा शारदा सहकारी बॅंकेचे 8000 सभासदांची भर बॅंकेत पडणार आहे. शारदा सहकारीच्या आठ शाखा आहेत. शारदा सहकारी बॅंकेने विलीनीकरण बाबतचा संचालक मंडळाचा ठराव कॉसमॉस बॅंकेस यापूर्वीच पाठवला आहे.
दि. 29 सप्टेंबरला शारदा सहकारी बॅंकेची सर्वसाधारण सभा होणार असून यामध्ये विलीनीकरण याबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे. दि. 30 सप्टेंबरला कॉसमॉस बॅंकेचे सर्व सर्वसाधारण सभा होणार असून या सभेच्या विषयपत्रिकेवर शारदा सहकारी बॅंकेच्या विलीनीकरणाचा विषय ठेवण्यात आला आहे. सर्वसाधारण सभेत मान्यता मिळाल्यानंतर विलीनीकरणाची प्रक्रिया लवकरच पार पडेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
400 कोटी रुपयांच्या ठेवी…
शारदा सहकारी बॅंक कॉसमॉस सहकारी बॅंकेत विलीनीकरण होणार असल्याने ठेवीदार खातेदार सभासद तर सर्वांनाच त्याचा फायदा होणार आहे. बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे. शारदा सहकारी बॅंकेच्या 400 कोटी रुपयांच्या ठेवी असून 200 कोटी रुपयांचे कर्ज वाटप आहे. यावर्षी बॅंकेला 70 लाख रुपयांचा नफा झाला असून सभासदांना पाच टक्के लाभांश वाटप करण्यात येणार असल्याचे बॅंकेचे अध्यक्ष आप्पासाहेब तावरे यांनी सांगितले.
रिझर्व बॅंकेचे धोरण…
एक हजार कोटीच्या खाली व्यवसाय असलेल्या छोट्या को-ऑपरेटिव्ह बॅंकांना मोठ्या बॅंकेत सक्तीने विलीनीकरण करण्यास रिझर्व बॅंक भाग पाडणार आहे. बॅंकांची संख्या कमी करून व्यवसायात सुसूत्रता आणण्याचे रिझर्व बॅंकेचे धोरण आहे. अलीकडच्या काळात छोट्या बॅंकांचे थकीत कर्जाचे प्रमाण वाढत चालले आहे. छोट्या बॅंकांच्या व्यवहारातील क्लिष्टता वाढत चालली आहे. त्यामुळे रिझर्व बॅंक छोट्या सहकारी बॅंकांचे मोठ्या बॅंकांमध्ये सक्तीने विलीनीकरण करणार असल्याची माहिती सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.