पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांची मागणी : पालिका आयुक्तांनी केली पाहणी
पुणे – अतिक्रमणांमुळे आंबिल ओढ्याला येणाऱ्या पुरामुळे दरवर्षी या भागातील घरांमध्ये पाणी शिरून जनजीवन विस्कळीत होते आणि मालमत्तेचे नुकसान होते. या भागाची महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी रविवारी पाहणी केली. या भागातील नगरसेवकांनी या प्रश्नासंदर्भात आयुक्तांकडे विविध मागण्या केल्या.
यावेळी मलनिस्सारण विभागाचे खानोरे, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, धनकवडी-सहकारनगरचे सहायक पालिका आयुक्त निलेश देशमुख इत्यादी अधिकाऱी उपस्थित होते. वर्षानुवर्षे माती वाहात येऊन आंबिल ओढ्याची खोली कमी झाली आहे. एक दोनदा जोरदार पाऊस झाला की लगेच ओढ्याला पूर येतो आणि आजूबाजूला राहण्याऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होते, अशी तक्रार स्थानिक नगरसेविका अश्विनी कदम यांनी केली.
हा प्रकार होऊ नये, म्हणून पावसाळ्यात धरणाप्रमाणे कात्रज तलावाचे पाणी सोडण्याचे नियोजन करावे जेणे करून पूर परिस्थिती निर्माण होणार नाही,”प्राइम मुव्ह’ ने केलेल्या सर्व्हेनुसार अतिक्रमणमुक्त करून 22 मीटर नाला रुंद करावा. कात्रज ते म्हात्रे पुलापर्यंत आंबिल ओढ्याची खोली आणि रुंदी पुढच्या 50 वर्षांचा विचार करून होणे गरजेचे आहे.
नाला उगम स्थानापासून जसे पुढे जाऊ तशी रुंदी-खोली वाढवणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात ढगफुटीसारखी परिस्थिती झाली, तरी पूरस्थिती होणार नाही. याशिवाय आंबिल ओढ्याच्या दोन्हीबाजूची अतिक्रमणे काढणे आवश्यक आहे. सीमाभिंत तातडीने बांधून लगतच्या नागरिकांना सुरक्षा द्यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.