पुणे – निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार जिल्ह्यात 330 मतदान केंद्र संवेदनशील आहेत. येथे कोणतेही गैरप्रकार घडू नयेत, यासाठी निवडणूक आयोगाची करडी नजर राहणार आहे. या मतदान केंद्रांवर “मायक्रो ऑबझर्व्हर’ नेमण्यात आले आहेत.
यादीमध्ये मतदारांचे छायाचित्र असण्याचे प्रमाण कमी आहे. ज्या मतदान केंद्रावर यापूर्वी 90 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे, तसेच या ठिकाणी एकाच उमेदवाराला 75 टक्के मतदान मिळाले आहेत सोबतच मतदान केंद्रावर गोंधळ, भांडणे, गैरप्रकार किंवा वारंवार एकाच मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये बिघाड होणे, असे प्रकार घडले आहेत. या निकषांच्या आधारे निवडणूक अधिकारी आणि पोलीस प्रशासन हे संवेदनशील मतदान केंद्रे जाहीर करतात. त्यासाठी या दोन्ही विभागांच्या बैठकाही झाल्या आहेत. त्यानुसार संयुक्तपणे संवेदनशील मतदान केंद्रांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांवर जिल्हा प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार आहे.
या केंद्रांवर निवडणूक आयोगाने नेमलेले “मायक्रो ऑबझर्व्हर’ प्रामुख्याने केंद्र शासनाच्या सेवेतील अधिकारी असणार आहे. हे अधिकारी प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मतदान केंद्रांमध्ये पूर्णवेळ उपस्थित राहणार आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ते मतदान केंद्राच्या परिस्थितीचा अहवाल केंद्रीय निवडणूक निरीक्षकांना त्याच दिवशी पाठविणार आहेत. शिवाय या मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून दिला जाणार आहे.