पुणे-गणेश खिंड रोडवरील वाहतूक समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. त्यात वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियमन करायचे सोडून वाहनचालकांना अडवून कागदपत्रांची तपासणी आणि दंड वसूलीवर भर दिला जात आहे. यामुळे वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम जलद गतीने सुरू आहे. गणेश खिंड रोडवर मेट्रो मार्गाचे पिलर टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी विद्यापीठ चौकातील वाहतुकीत बदल केला आहे. तर, काही ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मेट्रो प्रशासनाकडून कंत्राटी कर्मचारी आणि वाहतूक पोलिसांची नेमणूक केली आहे. मात्र, हे बदल करूनदेखील वाहतूक कोंडीची समस्या सुटलेली नाही.
नागरिकांना एक ते दीड किलोमीटर प्रवासासाठी सकाळी आणि सायंकाळी सरासरी एक ते दीड तास वेळ लागतो. वाहतूक नियंत्रण विभागाकडून यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक केली आहे. मात्र, हे पोलीस कर्मचारी वाहने थांबवून त्यांचे कागदपत्र तपासणी करण्यासह दंड वसूल करण्याला प्राधान्य देत आहेत. या कामात वाहतूक पोलिसांना मेट्रो प्रशासनाने नेमलेले कत्रांटी कर्मचाऱ्यांचीही मदत मिळत आहे. बाणेरकडून येणाऱ्या वाहनांना सेनापती बापट (एसबी) रस्त्यावर जाण्यासाठी चौकातून युटर्न मारून मागे येवून एसबी रोडला जावे लागते. त्यावेळी युटर्न घेताना पाठी मागे असलेली वाहने जागेवर थांबतात.