पुण- गोर-गरिबांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी करोनाच्या काळात सामाजिक बांधिकली जपत लाडू, चिवड्याचा उपक्रम सुरू ठेवणे कौतुकास्पद आहे. येथे करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेची काळजी तर घेतली जातच आहे. त्याबरोबरच अनेकांना काम मिळत आहे. या उपक्रमाची नोंद सर्व पुणेकरांनी घेतली हे खूप महत्त्वाचे आहे. पुण्याच्या गरजेला अनुरूप हा लाडू-चिवडा उपक्रम आहे, असे मत पणन संचालक सतिश सोनी यांनी व्यक्त केले.
दि पुना मर्चंट्स चेंबरच्या “रास्त दरात लाडू चिवडा’ उपक्रमाचे उदघाटन सोमवारी बिबवेवाडी येथील यश लॉन्स येथे पणन संचालक सोनी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनिल पवार, बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड उपस्थित होते. चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, उपाध्यक्ष अशोक लोढा, सचिव विजय मुथा, सहसचिव अनिल लुंकड, माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले, वालचंद संचेती, राजेंद्र बाठिया, प्रकाश नहार, रायकुमार नहार, जवाहर बोथरा आणि अभय छाजेड उपस्थित होते.
पवार म्हणाले, भारतामध्ये दिवाळीचे महत्त्व अन्यसाधारण आहे. गरिबाचा सण गोड व्हावा, यासाठी चेंबरकडून उपक्रम राबविला जात आहे. देण्याची वृत्ती खूप महत्वाची असते. मागील 33 वर्षांपासून चेंबर ही वृत्ती जोपासत आहे. समाजातील घटकांमध्ये आनंद निर्माण करण्याचे काम चेंबर करत आहे. सुनील पवार आणि मधुकांत गरड यांची विचार व्यक्त केले.