चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत पाऊस परतल्याने ओढे-नाले खळाळले
पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत गुरुवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे ओढे-नाले खळाळून वाहत असून, हे पाणी धरणांत जमा होत आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. मागील 24 तासांत खडकवासला प्रकल्पात 0.20 टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे. वाढलेला पाणीसाठा हा शहराला पाच दिवस पुरेल एवढा आहे.
पुणे शहराला खडकवासला प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला चार धरणांमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे धरणांत उपलब्ध होणाऱ्या पाणीसाठ्याकडे सर्वांचे लक्ष असते. यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर झाले आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.
गुरुवारी मात्र खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे धरणांमध्ये पाण्याचा येवा वाढला आहे. ओढे-नाल्यांद्वारे धरणात पाणी जमा होत आहे.
गुरुवारी दिवसभरात खडकवासला धरण परिसरात 22, पानशेतमध्ये 50, वरसगावमध्ये 54 आणि टेमघर धरणात 50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. दि.1 जूनपासून खडकवासला धरण क्षेत्रात-117, पानशेत-198, वरसगाव-203, टेमघर-215 मिमी पाऊस झाला आहे.