आंबेगाव बुद्रुक – कात्रज ते नवले पुलादरम्यान सलग दोन दिवस अपघात झाल्यानंतर तरी गांभीर्याने उपाययोजनेची घोषणा होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. परंतु, हाच रस्ता गेली दोन दिवस वाहतुकीने कोंडला जात असल्याने या रस्त्याच्या समस्यांकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे. या रस्त्यावर झालेल्या मोठ्या अपघातात आतापर्यंत दुचाकीस्वार बळी ठरले आहेत. त्यातच गर्दीतून वाहन बाहेर काढताना दुचाकी चालविणे कसरतीचे ठरत आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघात रोखण्यासह वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना आखाव्या लागणार आहेत.
कात्रज ते नवले पुलापर्यंत रस्त्यावर नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. कात्रजहून महामार्गाकडे ये-जा करणे सोयीचे असून सिग्नल नसल्याने या मार्गाने प्रवास केल्यास वेळ देखील वाचतो. यामुळे अनेक वाहनचालक या रस्त्याचा वापर करता. परंतु, या रस्त्याची रचना, रस्त्याकडेला वाढलेली अतिक्रमणे, अवजड वाहनांचा अतिवेग यामुळे आणि त्यातून होणारी वाहतूक कोंडी यामुळे वाहन चालविणे चालकांसाठी “जीवघेणे’ ठरत आहे.
कात्रजच्या मुख्य चौकामध्ये कात्रज घाट, कोंढवा, स्वारगेट आणि नवले पूल या चारही ठिकाणांहून येणारे रस्ते एकत्र येतात. त्यामुळे या चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला होता तसेच अपघातही घडत होते. परंतु, हा चौक तसेच रस्ते रुंद केल्याने येथील वाहतूक कोंडीसह अपघाताचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे कात्रज ते नवले पुलादरम्यान रस्ता रूंदीकरणासह, उतार कमी करणे, वेग मर्यादा ठरविणे, बेशिस्त चालकांवर कडक कारवाई करणे अशा उपाययोजना वाहतूक विभागाला कराव्या लागणार आहेत.
वाहन चालवायचे कसे…
कात्रज आणि नवले पुलाला जोडणारा रस्ता वाहनचालकांना धोकादायक वाटू लागला आहे. कात्रजकडून येणाऱ्या भरधाव वाहनांमुळे याठिकाणी अपघात होत असल्याने येथून वाहन चालविताना चालकांच्या मनातच भीती बसली आहे. नियम पाळून देखील असे गंभीर अपघात घडल्यास वाहने चालवायची कशी? असा सवाल दुचाकी चालकांकडून केला जात आहे.