पुणे – नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये मोजणाऱ्या महापालिकेने यंदा नवीनच प्रताप केला आहे. नदीतील जलपर्णी काढण्याऐवजी ती नदीतून पुढे ढकलण्याचा घाट सध्या सुरू आहे. त्यामुळे एका ठिकाणाहून ही जलपर्णी दुसऱ्या ठिकाणी जाऊन साठत असून पुन्हा ती काढण्यासाठी खर्च केला जाणार आहे. कॉंग्रेस भवनासमोरील वृद्धेश्वर-सिद्धेश्वर घाट परिसरात हा प्रकार बुधवारी सकाळी निदर्शनास आला आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून खडकवासला, डोणजे, वारजे परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहत आली आहे. ही या घाटाच्या ठिकाणी असलेल्या बंधाऱ्याला अडकत आहे. जलपर्णी येथून न काढल्यास ती पुढे बंडगार्डन आणि तिथून पुढे मुंढवा जॅकवेल येथे अडकून पडते.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात डास तसेच कीटकांचा उपद्रव नागरिकांना सहन करावा लागतो. असे असतानाही ही जलपर्णी नदीबाहेर काढण्याऐवजी ती पुढे ढकलण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा ती पुढे अडकल्यानंतर ती काढण्यासाठी खर्च होणार आहे. हे काम एकदाच का केले जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे पुणेकरांनी करापोटी भरलेला पैसा “पाण्यात’ जात असल्याची परिस्थिती आहे.