पुणे – मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे-जबलपूर या मार्गासाठी जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावरील गाडीसाठी प्रवाशांकडून होणारी मागणी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. या मार्गावर आता 12 अतिरिक्त गाड्या धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
मध्य रेल्वे प्रशासनाने वाढती प्रवासी संख्या लक्षात घेत 36 जादा विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मुंबई-पटना आणि पुणे-जबलपूर य रेल्वे मार्गांचा समावेश आहे. यामध्ये मुंबई-पटना मार्गावर 24 सुपरफास्ट विशेष रेल्वे धावणार आहे. तर, पुणे-जबलपूर मार्गावर 12 विशेष रेल्वे धावणार आहे.
मुंबई-पटना मार्गावरील रेल्वे ही 23 ऑक्टोबरपासून आठवड्यातून मंगळवारी आणि शुक्रवारी असे दोन दिवस मुंबई येथून रवाना होईल. पूर्वीच्या सुविधा एक्स्प्रेसप्रमाणेच या रेल्वेचे थांबे असतील. तर पुणे-जबलपूर मार्गावरील रेल्वे ही 27 ऑक्टोबरपासून आठवड्यातून एकदा दर मंगळवारी पुण्याहून रवाना होईल.
या गाड्यांमुळे या दोन्ही मार्गावरील प्रवासी संख्या सुरळीत होण्यास मदत होईल. मात्र, प्रवाशांनी सुरक्षिततेच्या प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.