डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचा अमृतमहोत्सव आणि आजी-माजी निलय विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
पुणे – धर्माबरोबरच शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार गरजेचा आहे. शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती होणार नाही. आज देशात धर्मावरून राजकारण सुरु आहे हे कुठेतरी थांबायला हवे. यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे समाजाचा कसा विकास होईल, याकडे आपण सर्वांनी लक्ष देणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन श्री श्री श्री 1008 जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.
एरंडवणे येथील कलमाडी हायस्कूल येथे जंगमवाडीमठ श्री जगद्गुरू विश्वाराध्य विद्यार्थी निलय, पुणे आणि श्री श्री श्री 1008 जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृतमोत्सवानिमित्त आजी-माजी निलय विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते अध्यक्षस्थानी बोलत होते.
यावेळी श्री. श्री. श्री. 1008 जगद्गुरू डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, नागपूरचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, दी विश्वेश्वर सहकारी बॅंकेचे चेअरमन अनिल गाडवे, ज्येष्ठ संचालक सुनील रुकारी, रेणूक शिवाचार्य महाराज, प्रबंधक काशी जंगमवाडी मठाचे नलिनी चिरमे, सचिन चिरमे, जंगमवाडी मठाचे व्यवस्थापक सुधाकर हलगणे, भरत उंबरकर आदी उपस्थित होते.
गणिततज्ज्ञ प्रा. डॉ. बसवराज मुडगी म्हणाले, “सर्वांच्या आयुष्यात गुरू असणे आवश्यक आहे. कारण गुरुमुळे आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळते तसेच समाजात चांगला व्यक्ती म्हणून काम करता येते. आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी अंतःकरणापासून प्रयत्न करणे आवश्यक आहे.’
डॉ. इरेश स्वामी म्हणाले, “शिवाचार्य महाराज यांनी धर्माच्या प्रचारासोबत सामाजिक काम करत समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी पुण्यात निवाऱ्याची व्यवस्था केली. त्यामुळे अनेकांना शिक्षण घेता आले. पीठाची शोभा न वाढवता त्यांनी त्यांनी अनेक सामाजिक काम केले. त्यात मराठवाड्यातील दुर्लक्षित ग्रंथांचे प्रकाशन केले.’
राजमाने म्हणाले, “निलयमध्ये राहिल्यामुळे चांगले संस्कार आणि शिस्त लागली. पोलीस दलात कर्तव्यात असताना 21 नक्षली अटक केले, 5 नक्षली सरेंडर केले. ज्या गावात निवडणूक होत नव्हती, तिथे निवडणूक घेतली. नागपूरची संघटित गुन्हेगारी संपून टाकली आहे. सरकारी नोकरी करताना कधीही भ्रष्टाचार केला नाही.’ सूत्रसंचालन श्रेयस उंबरकर यांनी केले, तर आकाश स्वामी यांनी आभार मानले.
दान हा खूप मोठा गुण आहे. व्यक्तीलाही मोठा बनवतो. अन्नदान, विद्यादान, आर्थिक दान, कन्यादान आहेत. परंतु विद्यादान हे आजीवन आनंद देत राहते. आपण काम करत असताना सामाजिक भान ठेवणे आवश्यक आहे. इतरांचाही विचार आपण करायला हवा, तरच देश प्रगतीपथावर जाईल.
– श्री श्री श्री 1008 जगद्गुरू
डॉ. चन्नसिद्धराम पंडितराध्य शिवाचार्य