ई-बसच्या अपघातानंतर वन विभाग, पीएमपी आणि बांधकाम विभागाचा आज दौरा
पुणे – सिंहगडावरून परतताना पीएमपीच्या ई-बसचा अपघात झाला. त्याची दखल वन विभाग आणि पीएमपी प्रशासनाने घेतली आहे. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी वन विभाग, पीएमपी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याची रविवारी संयुक्त पाहणी करणार आहेत. दरम्यान, घाट रस्त्यावर तातडीच्या काही उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सिंहगडावर जाण्यासाठी ई-बस सेवा सुरू करण्यात आली. तिला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच शुक्रवारी ई-11 क्रमाकांच्या बसला अपघात झाला आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने बस घाटाच्या सुरक्षा कठड्याला धडकली. यात प्रवासी बालंबाल बचावले.
दरम्यान, वाढत्या प्रदूषणाचे कारण देत वनविभागाकडून गडावर खासगी वाहनांना मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना गडावर जाण्यासाठी ई-बसचा आधार घ्यावा लागत आहे. पण ई-बसचा प्रवासच आता धोकादायक वाटत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य तोडगा काढण्याची गरज आहे.
पीएमपी बसचा अपघात का झाला?
* तीन कि.मी.चा अरूंद रस्ता
* ई-बसेसची लांबी मोठी
* गडावरून खाली येताना बऱ्याच ठिकाणी तीव्र उतार
* वळणाच्या ठिकाणी कॉन्व्हॅक्स आरसे नाहीत. त्यामुळे
* दूरची वाहने दिसण्यास अडचणी येतात
* दोन ठिकाणी जागेवर तीव्र वळण
अत्यावश्यक सेवा पुरवण्याची गरज
भविष्यात एखादा अपघात झाला तर तेथे अत्यावश्यक सेवा लगेच पुरविणे गरजेचे आहे. पण सध्या गडावर सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवांचा अभाव आहे. वन विभागाने या सेवा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्यानंतरच ई-बस सेवा सुरू करण्याची मागणी होत आहे.