पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के प्रवेशासाठी मागील तीन शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षातील विद्यार्थी प्रवेशात वाढ झाली आहे.
राज्यात “आरटीई’ अंतर्गत वंचित व दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्यात येते. सन 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. सुरुवात यासाठी अर्ज करणाऱ्यांची व प्रवेश घेणाऱ्यांची संख्या खूपच कमी होती. कालांतराने त्यात वाढ होत चालल्याचे आढळून येऊ लागले आहे.
सन 2012-13 मध्ये 2 हजार 532 शाळांमध्ये 9 जार 917 एवढ्याच विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते. त्यानंतर सन 2013-14 मध्ये 4 हजार 35 शाळांमध्ये 30 हजार 678, सन 2014-15 मध्ये 4 हजार 869 मध्ये 41 हजार 647, सन 2015-16 मध्ये 4 हजार 770 शाळांमध्ये 50 हजार 297 याप्रमाणे विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते. सन 2016-17 मध्ये 7 हजार 435 मध्ये 41 हजार 752 म्हणजेच 42 टक्के प्रवेश झाले. सन 2017-18 मध्ये 8 हजार 303 शाळांमध्ये 64 हजार 22 म्हणजेच 49 टक्के, सन 2018-19 मध्ये 8 हजार 976 शाळांमध्ये 74 हजार 302 म्हणजेच 65 टक्के प्रवेश झाले होते. सन 2019-20 मध्ये 9 हजार 195 शाळांमध्ये 44 हजार 395 म्हणजेच 66 टक्के एवढे प्रवेश पहिल्याच फेरी झाले आहेत.