राष्ट्रीय हरित लवादाच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश
पुणे – देशभरातील नद्यांमध्ये अजूनही पूर्णपणे प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जाते. नद्या प्रदूषित होण्याचे मुख्य कारण हेच आहे, असे स्पष्ट झाले आहे. सांडपाणी नि:सारण प्रक्रिया यंत्रणा या जुन्या पद्धतीने चालवल्या जात आहेत. ही यंत्रणा तातडीने अद्ययावत करावी आदेश राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने दिला आहे. हा आदेश देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थाना लागू असल्याची माहिती पर्यावरण कार्यकर्ते नितीन देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुण्यातील नितीन देशपांडे यांनी राष्ट्रीय हरित प्राधिकरणात केंद्र सरकारविरोधात याचिका दाखल केली होती. सांडपाणी प्रक्रिया अद्ययावत व्हावी तसेच सांडपाणी हे प्रक्रिया झाल्यानंतरही, नदीत सोडले जाऊ नये, ते शेती आणि उद्योगासाठी वापरले जावे ,नव्या अद्ययावत यंत्रणा वापरल्या जाव्यात, अशी मागणी देशपांडे यांनी केली होती. ही मागणी राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने मान्य केली आहे. न्या. आदर्शकुमार गोयल, के. रामकृष्णन, नगीन नंदा यांच्या पीठाने दि.30 एप्रिल रोजी हा निर्णय दिला आहे. सांडपाणी नि:सरणाच्या प्रक्रिया यंत्रणा पालिका आणि देशभर जुन्या पद्धतीने चालवल्या जात आहेत. नद्या, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कार्यक्षेत्रात जुन्या निकषांना अनुसरून सांडपाणी प्रक्रिया केंद्रे चालवली जात आहेत. त्यासाठी वेगवेगळे नियम पालिका, नद्यांना लागू होते. आता या निकालाद्वारे एकच आदेश लागू झाला आहे. देशभर लागू झालेला हा निर्णय अत्यंत ऐतिहासिक असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.