पुणे – पुणे- बंगळुरू महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांनी प्रवास करण्यासाठी नागरिक वडगाव (नवले पुलाच्या सुरुवातीला) येथे थांबतात. मात्र, मंगळवारी नवले पुलावर झालेल्या अपघातात रस्त्यावर उभ्या असणाऱ्या नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे या ठिकाणचा अघोषित थांब्यांवर उभे राहणे, नागरिकांच्या जीवावर बेतले आहे. त्यामुळे या ठिकाणी उभ्या राहण्याबाबत कार्यवाही होणे आवश्यक आहे.
महामार्गांवर अधिकृत थांब्यांची उभारणी केली जात नाही. येथे अनेक नागरिक महामार्गांच्या कडेला उभे राहतात. पुणे-बंगळुरू महामार्गावर प्रामुख्याने सातारा, कोल्हापूरकडे जाणाऱ्या खासगी बसेस, मालवाहतूक वाहने, प्रवासी वाहनांतून प्रवास करण्यासाठी नवले पुलाच्या सुरूवातीला थांबतात. यामध्ये प्रामुख्याने दररोज ये-जा करणाऱ्या नोकरदारांची संख्या अधिक असते. तर प्रवाशांना चढण्या-उतरण्यासाठी देखील वाहने याठिकाणी उभी असतात. प्रशासनाकडून देखील येथे थांबा घेणाऱ्या प्रवासी किंवा वाहनांवर कारवाई करण्यात येत नाही.
नागरिकांनी कोठे थांबायचे आणि कोठे नाही, हे निश्चित केले पाहिजेत. नवले पुलाच्या या परिसरात सातत्याने अपघात वाढत आहेत. या मार्गावर होणाऱ्या अपघातांचे प्रकार एकसमान आहेत. यामध्ये ट्रक आणि बसेसचा समावेश असल्याचे आढळते. या ठिकाणी काही भागात फलक असून, परंतु, त्याचे प्रमाण वाढवले पाहिजे. मात्र शास्त्रीय पद्धतीने रम्बलर्सची रचना करून, संख्या वाढवणे गरजेचे आहे. तर काही ठराविक अंतराने स्पीडब्रेकर असणे आवश्यक आहे. याचबरोबर महामार्गावर आयटीएमएस यंत्रणा आवश्यक असून, यामुळे अपघातांची कारणे स्पष्ट होऊ शकतात.
– तन्मय पेंडसे, महामार्ग अभ्यासक
या मार्गावर अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. मंगळवारी झालेला अपघात मानवी चुकीमुळे झाला आहे. यामध्ये रस्त्याचा किंवा मूलभूत सुविधांमध्ये त्रुटी नसल्याचे निदर्शनास आले आहे.
– राहुल श्रीरामे, उपायुक्त, वाहतूक शाखा