पुणे : सध्याच्या काळात आपण काय खातो, मुलांना काय खायला देतो, याचा साकल्याने विचार होणे आवश्यक आहे. विषयुक्त अन्नधान्यामुळे अनेक आजार वाढले आहेत. आरोग्य टिकविण्यासाठी देशी वाणाचा वापर करा, विषमुक्त अन्न खा, पुन्हा निसर्गाकडे चला, असा संदेश देत माझ्या कार्यामुळे प्रत्येकाचे ताट विषमुक्त झाल्यास माझ्या कार्याचे चीज होईल, असे उद्गार पद्मश्री राहिबाई पोपेरे यांनी काढले. मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान नको, तर निसर्गाचे, काळ्या मातीचे ज्ञान द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सह्याद्री देवराई व भारती विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्रातील पहिल्या दोन दिवसीय बीज संमेलनात त्या बोलत होत्या. या वेळी बीजमाता राहिबाई पोपेरे यांचा ज्येष्ठ शास्त्रीय गायक आचार्य पंडित मुकुल शिवपुत्र यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. भारती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या बियांतून भारती विद्यापीठ शालेय समितीच्या अध्यक्षा विजयमाला पतंगराव कदम यांची या वेळी बीजतुला करून व सन्मानपत्र देऊन त्यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. डॉ. विश्वजीत कदम यांनी सामाजिक बांधिलकी जपत डॉ. पतंगराव कदम फाउंडेशनच्या माध्यमातून सह्याद्री देवराईच्या उपक्रमांस 25 लाख रुपयांचे देणगी जाहीर केली.
विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, भारती विद्यापीठ रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलन्सच्या अध्यक्षा स्वप्नाली कदम, विजयमाला पतंगराव कदम, सह्याद्री देवराईचे अध्यक्ष सयाजी शिंदे, उपाध्यक्ष अरविंद जगताप, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, संगीत दिग्दर्शक शैलेश निसर्गंध, भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सेसच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, उपवन संरक्षक महादेव मोहिते मंचावर होते.
सयाजी शिंदे म्हणाले, बीज संमेलनाचा मुख्य उद्देश राज्यातील शाळा आणि महाविद्यालय, तसेच विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना निसर्ग आणि पर्यावरणाची गोडी लावणे, त्यांना केवळ भाषण न देता कृतिशील सहभाग घ्यायला लावणे, तसेच आपल्या झाडांची आणि बियांची ओळख करून देणे, ती झाडे वाढवण्यासाठी त्यांच्या देखभालीसाठी सक्रिय राहणे हा आहे. झाडाला देव मानून झाडे लावा, वाढवा आणि जगवा, असा संदेशही त्यांनी दिला.