फुरसुंगी -हडपसर-सासवड राष्ट्रीय महामार्ग क्र.965 या पालखी मार्गावरून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आठ दिवसांनी म्हणजेच दि. 14 जुनला जाणार आहे. यापार्श्वभूमीवर या मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असले तरी ते खूपच अशास्त्रीय पद्धतीचे तसेच निकृष्ट दर्जाचे होत आहे. यामुळे यावर्षी पालखी सोहळ्याचा मार्ग खडतरच असणार आहे.
हडपसर येथे रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली बाजुच्या साईडपट्ट्या जेसीबीच्या सहाय्याने खोदून मातीमिश्रित मुरुम पसरविला जात आहे. खोदलेल्या साईडपट्टयांमध्ये जाड मुरुम भरला जात नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा पावसाचे पाणी साचून पाण्याची डबकी व दलदल, चिखल तयार होऊन वारकऱ्यांची वाट बिकट झाली आहे. रस्त्याचे काम दर्जेदार होत नसल्याने अपघातांची मालिका सुरुच आहे. संबंधित प्रशासनाने तत्काळ या मार्गाची पाहणी करुन योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
हडपसर-सासवड मार्गावर तुकाई दर्शन ते दिवेघाट दरम्यान पालखी सोहळ्यानिमित्त रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. पालखी सोहळा आठ दिवसांवर येऊन ठेपलेला असताना संबंधित खात्याकडून हे काम फारसे गांभीर्याने होत असल्याचे दिसत नाही, जेसीबीच्या सहाय्याने आहे त्याच साईडपटट्या खोदून त्यातील माती मिश्रीत मुरुम काढुन इतरत्र पसरविला जात आहे .त्यामुळे रस्त्याकडेला पावसाचे पाणी साचून चिखल, पाण्याची डबकी,दलदल तयार होत असल्याने वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. घाण पाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.पालखी मार्गातील अतिक्रमणे व धोकादायक होर्डिंग्ज काढून रस्ता मोकळा करणे गरजेचे आहे, अन्यथा मोठी दुर्घटना होण्याचा धोका आहे. संबंधित प्रशासनाने या मार्गाची योग्य पद्धतीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरीकांनी केली आहे.