पुणे, दि. २६ – साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेली अक्षय्यतृतीया बुधवारी (दि.३०) आहे. या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डातील फळ विभागात कोकणातून आंब्याची आवक वाढली आहे. भावही सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात आला आहे. एक डझनाच्या तयार मालाला सध्या दर्जानुसार बाजारात ४०० रुपयांपासून ८०० रुपये मोजावे लागत आहेत. मात्र, यंदा बदलत्या हवामानाचा फटका हापुसला बसल्याने उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून दरवर्षीच्या तुलनेत यंदा एक महिना अधीच हापुसचा हंगाम संपणार आहे.
मागील वर्षी उशीरापर्यंत राहिलेला पाऊस आणि कमी पडलेल्या थंडीमुळे हापूसच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे हंगामाच्या पहिल्या टप्प्यात आवक कमी आणि भाव अधिक होते. मात्र, आता आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तयार आणि कच्चा माल बाजारात अधिक प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे पेटी आणि डझनाच्या भावात घट झाली आहे. मार्केटयार्डातील फळ बाजारात दररोज ४ ते ५ हजार पेटींची आवक होत आहे. ही आवक वाढली असली, तरीही मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे. मागील वर्षी याच काळात दररोज ७ ते साडेसात हजार पेटींची आवक होत होती. यंदा कोकणातील उन्हाळा तीव्र आहे. त्यामुळे फळ लवकर तयार होत आहे. त्यामुळेच बाजारात तयार माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. आता, अक्षय्य तृतीयाला भावात वाढ होण्याची शक्यता नसल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले.
बाजारातील भाव
हापूस (तयार) ५ ते ९ डझन : २५०० ते ४५००
हापूस (कच्चर) ५ ते ९ डझन : १५०० ते ३५००
हापूस (तयार) १ डझन : ४०० ते ८००
दरवर्षी १५ जूनपर्यंत कोकणातील हापूसचा हंगाम सुरू असतो. मात्र, यंदा हवामान बदलामुळे झाडांना फळ धारणा कमी झाली आहे. त्यामुळे यंदा १५ मे पर्यंतच हंगाम राहिल. त्यानंतर आवक एकदम घटणार आहे. त्यानंतर तुरळक आवक सुरू राहिल.
– युवराज काची, कोकण हापूसचे व्यापारी, मार्केट यार्ड