पिरंगुट -मुळशी प्रादेशिक नळपाणी पूरवठा योजनेचे वीज बील थकल्याने महावितरणकडून वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून मुळशीतील 21 गावांचा पाणीपुरवठा बंद राहिला आहे. या गावातील नागरिकांना गेल्या दोन दिवसांपासून पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
मुळशी धरणातून मुळशीतील पौड, पिरंगुट, कासारआंबोली, घोटावडे या मोठ्या गावासह 21 गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र यातील काही गावाकडून मुळशी प्रादेशिकला पाणीपट्टी भरली जात नाही. तथापि मुळशी नळपाणीपुरवठा योजनेकडूनही महावितरणचे तब्बल 80 लाख रुपये वीजबील थकले आहे. यातील दहा लाख प्रादेशिक कडून भरण्यात आले आहे; मात्र अजूनही 70 लाख रूपये वीजबील भरणे बाकी आहे.
नागरिकांकडून ग्रामपंचायतीला, ग्रामपंचायतकडून मुळशी प्रादेशिकला पट्टी भरली जात नाही. मुळशी प्रादेशिकला दरमहा नऊ ते साडेनऊ लाख रूपये वीज बील येते. गेली काही महिने वीज बील न भरल्याने महावितरणकडून दोन दिवसांपूर्वीच दोन ठिकाणी मुळशी प्रादेशिकचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला असून 21 गावांना याचा फटका बसला आहे. यामुळे नागरिकांना पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे. पाणीपट्टी थकीत नागरिकांमुळे पाणीपट्टी भरणाऱ्यांवर अन्याय होत असून.
नागरिकांनी वेळेत ग्रामपंचायतीला पाणीपट्टी भरल्यास पाणी पुरवठा योजनेला बळ मिळू शकेल. त्यामुळे वीजबील थकणार नाही. ग्रामपंचायतींना अखंडित पाणीपुरवठा करता येणे शक्य आहे.
– सुनिल पटेकरी, अभियंता मुळशी नळ पाणीपुरवठा