– जीवन सोनवणे
सारोळा -ऐशोरामी जीवन जगण्याच्या स्वप्नात असलेल्या तरुणाईची पावले दिवसेंदिवस गुन्हेगारीकडे ओढली जात असल्याचे गेल्या काही वर्षांपासून दिसून येत आहे. आतापर्यंत पोलिसांनी विविध गुन्ह्यांत अटक केलेले गुन्हेगारांमध्ये 18 ते 25 वर्षे वयोगटातील मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काही बालगुन्हेगार असल्याचेही निष्पन्न झाले आहे.
भोर तालुक्यात राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांत दुचाकी, सोनसाखळी चोरी, रस्तालूट, घडफोड्या, खंडणी, मुलींची छेडछाड, अत्याचार, विनयभंग या प्रकारच्या गुन्ह्यात लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा एकतरी कमी पडत आहे किंवा गुन्हेगारांचे प्रशासकीय यंत्रणेशी साटेलोटे आहे, असे म्हणावे लागेल.
गेल्या काही वर्षात पोलीस प्रशासनाने अनेक गुन्ह्यांची उकल करीत अनेक गुन्हेगार जेरबंद केले आहेत. यातील मोठ्या गुन्ह्यातील बालगुन्हेगारांना बालसुधारगृहात ठेवून नंतर सोडून देण्यात येते तर छोट्या गुन्ह्यातील बालगुन्हेगारांना अटक न करताच समज देऊन सोडून देण्यात येते. त्यामुळेच या बाल गुन्हेगारांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ मिळते आहे.
ब्रॅंडेड वस्तू, आलिशान गाड्यांची भुरळ
गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी तरुणांना हाताशी धरून चुकीच्या पद्धतीने पैसा कमवण्यास सुरुवात केली. त्यातूनच वेगवेगळ्या टोळ्यांचा उदय झाला. याच टोळ्यांचे अनेक दादा हे नंतर मोठमोठ्या बॅनरवर झळकू लागले. ब्रॅंडेड वस्तू, आलिशान गाड्या, शेकडो लोक मागे-पुढे असणं याचगोष्टी तरुणांना आकर्षित करू लागल्या आहेत. क्षुल्लक कारणांवरून कार किंवा बाइक जळीतकांड देखील वाढू लागले आहे.