शिवाजीराव आढळराव पाटील ः मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक
मंचर : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक शिवसेना-भाजप पूर्ण ताकदीने लढवणार असून, त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
मंचर ता. आंबेगाव येथे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटी यांच्या चंद्रभागा संपर्क कार्यालयात शिवसेना-भाजप पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची शुक्रवार (दि. 31) बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. भाजपाचे तालुकाप्रमुख डॉक्टर ताराचंद कराळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अरुण गिरे, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, विजयराव पवार, संदीप बाणखेले, रवींद्र करंजखेले, तुकाराम काळे, सचिन बांगर, युवानेते स्वप्निल बेंडे पाटील, संतोष डोके, धनेश मोरडे, सुशांत थोरात, गणेश बाणखेले, मालती थोरात उपस्थित होते.
आंबेगाव तालुक्यात सहकारामध्ये यापूर्वकाळात आपण लक्ष घातले नव्हते; परंतु आता लक्ष घालण्याची वेळ आलेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी फोन करून बाजार समितीच्या कारभाराकडे लक्ष देण्यासाठी विनंती केली आहे, त्यामुळे येथून पुढे होणाऱ्या सर्वच निवडणुका शिवसेना आणि भाजप पक्षाच्या समन्वयाने लढवल्या जातील. मंचर बाजार समितीत चाललेला कारभारावर शेतकरी नाराज आहे. जनावरांचा बाजार बंद आहे.
भाजी बाजार बंद आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले बाजार समितीतील पारदर्शक कारभार देण्यासाठी शिवसेना आणि भाजप पक्षाच्या वतीने पूर्ण पॅनल तयार करून निवडणूक रंगतदार केली जाणार आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. मंचर बाजार समितीच्या निवडणुकीत स्वतः लक्ष देणार आहे.