विहीरच नाही, पाणी कसे येणार ः सरपंच नवघणे यांचा सवाल
खामगाव मावळ राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम अपूर्ण
अधिकारी, ठेकेदारांमुळे पाणी मिळत नसल्याचा आरोप
खडकवासला – खामगाव मावळ राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत खामगाव मावळ येथे नळ पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे, असा आरोप सरपंच सत्यवान नवघणे यांनी केला आहे.
जागोजागी अनेक वेळा उंदरांनी मुख्य जलवाहिनी कुरतडल्याने अनेक ठिकाणी छिद्र पडली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. ठेकेदारामार्फत पुन्हा पुन्हा जलवाहिनी दुरूस्त करूनही ती फुटत आहे. या योजनेची विहीरच अस्तित्वात नसून ठेकेदार लोकांना विहिर नसताना पाणी कसे देऊ शकतो? हा प्रश्प अनुत्तरीतच आहे.
उपविभागीय अभियंता पाणी पुरवठा विभाग यांच्याशी वारंवार विचारणा केली असता पुढच्या नविन योजनेमध्ये विहिर घेण्यात येणार आहे, असे उत्तर त्यांनी दिले; परंतु यापूर्वी याच योजनेतून विहिर व लोखंडी जलवाहिनी का झाली नाही. पहिल्या योजनेत विहिर मंजूर असताना ती का बांधण्यात आली नाही. जर विहिरच बांधण्यात आली नाही तर मंजूर विहिरीचा निधी कुठे खर्च झाला. तसेच पुढील योजनेमध्ये विहिर कशी धरण्यात आली, या प्रश्नांचे उत्तर ठेकेदार व अधिकारी यांनी प्रत्यक्ष गावामध्ये येऊन द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
राष्ट्रीय पेयजल योजनेतील राहिलेल्या विहीरीचे बांधकाम करून द्यावे. तसेच अर्धवट राहिलेले सर्व वाड्या वस्त्या वरील कामे त्वरित पूर्ण करावे. या योजनेची देखभाल दुरूस्ती मुदत किती आहे, याचीही माहिती नाही. झालेल्या राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत झालेल्या मंजूर कामाचे निधी फलक देखील लावण्यात आले नाहीत. त्यामुळे ही 2 कोटी 44 लाख रुपयांची योजना भष्ठाचाराच्या भोवऱ्यात सापडली आहे का? आशी चर्चा परिसरात नागरिकांकडून होत आहे.
ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांनी खामगाव मावळ या आमच्या गावात येऊन सर्व नागरिकांना या योजनेतून झालेल्या कामाची माहिती देणे अनिवार्य असते. माहिती देणे आणि राहिलेली प्रलंबित कामे मार्गी लावावीत, अशी आमची मागणी आहे.
-सत्यवान नवघणे, सरपंच खामगाव मावळ