राजेंद्र वारघडे
पाबळ – शिरूर तालुक्यातील पाबळ येथील ग्रामीण रुग्णालयाची उभारणी पूर्ण होऊन चार वर्षे झाली आहेत. तरीही त्याचा लाभ गोरगरीब रुग्णांना होत नसल्याने पाबळसह परिसरातील गावामधील नागरिक तीव्र संताप केला आहेत. हे रुग्णालय “असून अडचण, नसून खोळंबा, अशा अवस्थेत आहे. त्यामुळे श्रीमंत बाजीराव सांस्कृतिक प्रतिष्ठानचे वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी 2014 मध्ये रुग्णालयाचे भूमिपूजन केले होते. त्यानंतर अनेक अडचणींना तोंड देऊन रुग्णालयाची उभारणी पूर्ण केली. मात्र, करोनासह अनेक समस्यांना तोंड देत जगत असलेल्या गोरगरीब रुग्णांना आजही उपचारासाठी धावपळ करावी लागत आहे.
रुग्णालयाची उभारणी पूर्ण झाली असली तरी काही त्रुटी असल्याची माहिती आहे. संबंधित शासकीय विभागाकडून रुग्णालयाच्या त्रुटींकडे कानाडोळा होत आहे. याबाबतीत पदाधिकारीही सोयीस्कर मौन बाळगत असल्याने गोरगरीब नागरिकांना मात्र हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे.
कार्यकर्ते आता उदासीन का?
माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भूमिपूजनावेळी रुग्णालयाची उपयुक्तता सांगितली होती. त्यामध्ये पाबळ, केंदूर, जातेगाव,मलठण व मंचर येथील मोठी रुग्णालये व आरोग्य उपकेंद्रामार्फत गोरगरिबांसाठी आरोग्यसेवेचे मोठे जाळे उभारून उच्च दर्जाची आरोग्य सुविधा व रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात येणार आहे. याचा लाभ गोरगरिबांना मिळवून देण्यासाठी उपस्थितांना आवाहन केले होते. त्यावेळी उपस्थित असणारे कार्यकर्तेही आता रुग्णालय सुरू करण्यासाठी नेमके का उदासीन आहेत, अशी चर्चा सुरू आहे.
प्रतिष्ठानचे पदाधिकारी पालकमंत्र्यांना भेटणार
रुग्णालयाबाबत नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर बाजीराव सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेण्यात येणार आहे. नागरिकांसह आंदोलन सुरू करण्यासाठी पावले उचलणार असल्याची माहिती अध्यक्ष संजय ढहाळे, उपाध्यक्ष चंद्रशेखर वारघडे, खजिनदार राज गायकवाड व निवृत्त लष्करी अधिकारी संजय रत्नपारखी यांनी दिली.
रुग्णवाहिका धूळखात
महिलांना मोठ्या दिव्यातून जावे लागत आहे. गर्भवतींसह इतर व्याधींना तोंड देताना वेळप्रसंगी दामदुप्पट किंमत मोजून शहरात उपचार घ्यावे लागत आहेत. रुग्णालयात धूळखात असलेली नवी रुग्णवाहिका असूनही तिचाही लाभ होत नाही. रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट हा झाडाझुडपांच्या विळख्यात सापडला आहे. झाडे पाण्याविना जळत आहेत. साहित्य धुळीत हरवले आहे. परिसरात गवताचे साम्राज्य वाढले आहे. भव्य इमारत असूनही तिची दुरवस्था झाली आहे.
“ग्रामीण रुग्णालयाची उभारणी होऊन चार वर्षे झाली आहेत. सुसज्ज सुविधांसह रुग्णालय सुरू करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत.”
– बी एस राऊत, वैद्यकीय अधीक्षक, पाबळ.