सरपंच पतीला साथ देणाऱ्या ग्रामसेवकावरही कारवाई हवी
विशाल भालेराव
खडकवासला : महिला सरपंचाच्या पतीराजाला आता ग्रामपंचायतीत “नो एन्ट्री’ असताना पश्चिम हवेलीमध्ये बहुतांश ग्रामपंचायतमध्ये असे प्रकार दिसून येत आहेत. सरपंच महिलांचे पतीच सरपंच म्हणून गावात वावरताना दिसतात. संबंधित अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. ग्रामपंचायतमध्ये महिला सरपंचांचा पती ग्रामसेवकांच्या सहमतीतून हस्तक्षेप करत असेल तर संबंधित ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी सिंहगड परिसरातून करण्यात येत आहे.
सरपंच गावाचा प्रथम नागरिक असल्याने त्याचा वेगळाच तोरा असतो. महिला सरपंच सक्षम असतानाही, अनेक पतीराज किंवा नातेवाईक कामात हस्तक्षेप करीत कारभार करतात. त्यामुळे शासनाने सरपंचाच्या पती व नातेवाइकाला कार्यालयातच येण्यास बंदी केली आहे. तसेच कामात हस्तक्षेप आढळून आल्यास थेट कारवाई करण्याचा निर्णय घेतला घेतला होता. पत्नी सरपंच असली तर पती तिच्या कामात लुडबूड करीत असल्याचे अनेकदा अनेक ठिकाणी पहायला मिळते; परंतु आता पती किंवा नातेवाईक हस्तक्षेप करताना आढळून आल्यास थेट कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. पण काही ठिकाणी या शासनाचा निर्णयाला केराची टोपली दाखवण्यात येत आहे.
मी या निर्णयाचे स्वागत केले होते. अनेक महिला सरपंचांमध्ये नेतृत्वगुण असूनही त्या महिला सरपंचांना केवळ समाजाचा आणि पतीचा मान राखण्यासाठी नाइलाजास्तव म्हणून काम करावे लागते. पुरुषी संस्कृतीला चाप बसून अनेक महिलांनी आपले नेतृत्व सिद्ध केले पाहिजे. आमच्या गावात असा कोणताही प्रकार होत नाही.
-शिल्पा गायकवाड, सरपंच खानापूर (ता. हवेली)
50 टक्के ग्रामपंचायतींमध्ये महिलांना सरपंच होण्याचा मान मिळतो. त्यावेळी अपवादात्मक ग्रामपंचायतीमध्ये महिला पतीचा हस्तक्षेप असतो; परंतु आज महिलाही ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळण्यास सक्षम झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असून त्या ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळण्यास सक्षम होत चालले आहेत. ही समाधानाची बाब आहे.
-शीतल भामे, सरपंच डोणजे (ता. हवेली)
खरंच कोणत्या ग्रामपंचायतीत असा प्रकार होत असेल आणि महिला सरपंचाला मनाविरुद्ध दबावाखाली काम करण्याची वेळ येत असेल. संबंधित गावातील नागरिकांनी थेट कारवाईसाठी अर्ज करावेत, म्हणजे कुठेतरी बदल होईल.
-संगीता भालेराव, सरपंच वरदाडे (ता. हवेली)
काही ठिकाणी महिला सरपंचांनी घेतलेल्या निर्णयांना काही ग्रामस्थांकडून प्रखर विरोध होतो. त्यामुळे महिला आरक्षणाचा हेतू खरंच साध्य होतोय का, असा उद्विग्न सवाल उपस्थित होत आहे. महिला सरपंचांनी आपल्या कार्यकाळात केलेली विकास कामे ही पुरुष सरपंचांना लाजवणारी असावी. सत्यमेव जयते हे वाक्य उराशी बाळगून गावातील विकास कामे केली तर असे प्रकारच होणार नाहीत.
-नंदा जोरी, सरपंच मालखेड (ता. हवेली)