हिंजवडी- मागील आठवड्यात सलग दोन वेळा झालेल्या अवकाळी पावसामुळे मुळशीतील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. ज्वारी, बाजरी, गहू ही पिके व फळबागा तसेच अनेकांच्या आमराई व शेतातील उभी पिके तर अक्षरश: झोपली आहे. परंतु अजूनही सरकारकडून शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही.
अवकाळी पाऊस होऊन आठवडा उलटला आहे. महसूल प्रशासनाने केवळ कृषी विभागाच्या अहवालानुसार 5.7 हेक्टर वरील पिकांचे पंचनामे करून अहवाल पाठविला आहे. त्यामुळेच मदत कधी मिळणार याकडे बळीराजाचे लक्ष लागून राहिले आहे. आयटी पार्क म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या हिंजवडी भागात येथील काही शेतकऱ्यांनी आयटीच्या झगमगाटातही आपल्या जमिनी राखल्या आहेत.
निष्ठेने जमिनी कसणाऱ्या या शेतकऱ्यांना गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळीचा फटका बसला आहे. हजारो एकरावरील शेतीचे मोठे नुकसान होऊनही अद्याप कोणत्याच शेतकऱ्यांच्या पिकाचा पंचनामा केलेला नाही. हिंजवडीसह लगतच्या ताथवडे, माण, मारुंजी, नेरे, जांबे, पुणावळे, कासारसाई या गावात शेतीत हजारो हेक्टरवर उन्हाळ्यात ज्वारी,
बाजरी, गहू, कांदा, लसूण, पालेभाज्या, फळ भाज्या, आंबा, डाळिंब इत्यादी पिके घेतली जातात. मात्र नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्याने सर्व पिके भुईसपाट झाली आहेत. परंतु पंचनामे होत नसल्याने शेतकऱ्यांना वाली कोण असा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.
आपत्कालीन संकटात आपल्याकडे कुठल्या भागात शेतीचे किती नुकसान झाले याबाबत कृषी खात्याकडून आम्हाला रिपोर्ट येतो. त्यानुसार त्या-त्या गावातील ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायक यांची ग्रामस्तरीय समिती पंचनामे करते. आम्हाला याबाबत नुकतीच कृषी खात्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यानुसार 19 शेतकऱ्यांचे 5.7 हेक्टर शेती क्षेत्राचे पंचनामे करून सरकारकडे कालच अहवाल पाठविला आहे.
– अभय चव्हाण, तहसीलदार, मुळशी.
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून पंचनामे करण्यात यावे. सरकारच्या घोषणा आणि अधिकाऱ्यांचा असणारा निष्काळजीपणा याच्यावर जनजीवन विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका ठेवावी. जगाचा पोशिंदा संकटावर मात करून उपजीविका करत आहे. परंतु याचे अधिकाऱ्यांना काहीच देणे-घेणे नाही.
– कैलास जाधव, ऍग्रोआयडॉल कृषिनिष्ठ शेतकरी, नेरे.