दौंड -चौफुला – बोरीपार्धी येथे किरकोळ वादातून पिस्तूलामधून दोन गोळ्या झाडून गोळीबार करण्यात आल्याची घटना मंगळवारी (दि. 29) रात्री सव्वासातच्या सुमारास घडली. याबाबत बंडू ऊर्फ आप्पा राणू कोळपे (रा. चौफुला ता. दौंड, पुणे) यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी मच्छिंद्र बापुराव दिवेकर, साहिल इस्माईल शेख (दोघे रा. वरवंड, ता. दौंड) यांच्यावर यवत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी रात्री सव्वा सातच्या सुमारास फिर्यादी बंडू ऊर्फ आप्पा राणू कोळपे व त्यांचा मित्र राजु भोसले (रा. बोरीपार्धी, ता. दौंड) हे दोघे चौफुला येथील हॉटेल शिवानंद रेस्टॉरंट बार ऍण्ड लॉजिंग येथे जेवण करण्यासाठी गेले होते. दोघे जेवन करून हॉटेलच्या बाहेर आले. त्यावेळी अक्षय शिंदे, त्याचा जोडीदार आणि मच्छिंद्र दिवेकर, साहिल शेख, (दोघे रा. वरवंड, ता. दौंडे) यांच्यामध्ये बाचाबाची सुरू होती. यावेळी अक्षय व त्याचा साथीदार यांनी आप्पा तुम्ही मच्छिंद्र दिवेकर, साहील शेख यांना सांगा हे दोघे माझ्यासोबत विनाकारण शिवीगाळ, दमदाटी करीत असल्याचे म्हटले.
यावेळी फिर्यादी बंडू कोळपे यांनी मच्छिंद्र दिवेकर, साहिल शेख यांना म्हणाले की कशाला भांडणे करता? त्यावेळी दिवेकर याने फिर्यादी बंडू यांना कोण आहेस तू, तुला आता बघतोच असे म्हणत साहील याने फिर्यादी बंडू यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तर दिवेकर याने त्याच्या खिशातुन पिस्तूल काढला. दरम्यान बंडू व त्यांचा मित्र राजू हे घाबरून हॉटेलकडे पळुन जात असताना दिवेकर याने त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या दिशेने गोळीबार केला.
त्यानंतर फिर्यादी बंडू कोळपे व राजु भोसले यांना हॉटेलचे मालक कपिल गायकवाड यांनी हॉटेलमध्ये घेऊन हॉटेलचे शटर बंद केले. त्यानंतर दिवेकर यांनी आप्पा बाहेर ये, आज तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणुन पुन्हा गोळीबार केला, असे फिर्यादित म्हटले आहे.
या घटनेनंतर हॉटेलचे मालक कपिल गायकवाड यांनी फिर्यादी बंडू कोळपे व राजु भोसले या दोघांना हॉटेलच्या पाठीमागील बाजुने बाहेर काढुन दिले. यानंतर बंडू कोळपे यांनी रात्री उशीरा यवत पोलिसांत तक्रार दिली.