लोणी काळभोर – येथील ग्रामपंचायतींच्या हद्दीत असलेल्या फुरसुंगी रेल्वे स्थानकावरील मालधक्क्यात केमिकलयुक्त राख रेल्वेने आणून त्याची वाहतूक करण्याच्या विरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन यशस्वी झाले असून या धक्क्यात ही केमिकलयुक्त राख आणणार नाही, असे आश्वासन संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांना दिले आहे.
लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीत पुणे -कोल्हापूर लोहमार्गावर फुरसुंगी रेल्वे स्थानक आहे. या स्थानकावर गेल्या दोन वर्षांपासून मालधक्का सुरू झाला आहे. या मालधक्क्यावर सिमेंट, केमिकलयुक्त राख आदी वस्तू रेल्वेने आणून ट्रक, डंपर, हायवा यांच्या माध्यमातून हा माल वेगवेगळ्या ठिकाणी पोच केला जातो.
केमिकलयुक्त राख वजनाने हलकी असल्याने, रेल्वेतून खाली उतरवताना व डंपरमध्ये भरताना मोठ्या प्रमाणात वाऱ्यामुळे उधळते. व परिसरातील शेकडो एकर शेतजमिनीतील पिकांवर जाऊन पडत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या संदर्भात वेळोवेळी शेतकऱ्यांनी संबंधितांना या संदर्भात सविस्तर माहिती दिली होती.
या तक्रारींची दखल न घेतल्याने लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे सदस्य नागेश काळभोर, माजी सदस्य बाळासाहेब काळभोर, इंद्रभुज काळभोर, आप्पासाहेब काळभोर, गजानन काळभोर यांच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन सुरू करण्यात आले होते. या संदर्भात लोणी काळभोर पोलीस ठाणे, लोणी काळभोर ग्रामपंचायत, रेल्वे प्रशासन, फुरसुंगी रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर यांना 150 शेतकऱ्यांनी लेखी अर्ज करून कल्पना दिली होती.
या संदर्भात शेतकऱ्यांनी फुरसुंगी रेल्वे स्थानकाचे मास्तर शाम कृष्णा यांना गुरुवारी (दि. 19) निवेदन दिले. बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती या निवेदनात देण्यात आली आहे. यावेळी लोणी काळभोर ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, माजी सदस्य बाळासाहेब काळभोर, चीफ कमर्शिएल इन्स्पेक्टर माधव अन्नदाता, गुड्स सुपरवायझर हेमंत मोरे, विकी नरके, रेल्वेचे पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.
संबंधित धक्क्याच्या ठेकेदाराचे प्रतिनिधी व स्थानिक शेतकरी यांच्यात गुरुवारी (दि. 19) फुरसुंगी रेल्वे स्थानकावर बैठक झाली. यावेळी जोरदार चर्चा झाली. ठेकदाराच्या प्रतिनिधींनी आलेली रेल्वे खाली करून देण्याची विनंती केली; मात्र शेतकऱ्यांनी आपली बाजू जोरदारपणे मांडून केमिकलयुक्त राखेची एकही रेल्वे गाडी येथे खाली उतरवायला विरोध केला. बराच वेळ चर्चा होऊन ही केमिकलयुक्त राख फुरसुंगी रेल्वे स्थानकावर परत न आणण्याचे कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले.
मालधक्क्याला शेतकऱ्यांचा विरोध नाही. सिमेंट किंवा इतर माल आणायला शेतकऱ्यांचा विरोध नाही. केमिकलयुक्त राख येथे आणण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. परत राख आणण्याचा प्रयत्न केल्यास शेतकरी प्राणपणाने त्या विरोधात लढतील.
– नागेश काळभोर, सदस्य, लोणी काळभोर ग्रामपंचायत
या परिसरातील शेतकऱ्यांचे प्रमुख साधन असलेली शेती या केमिकलयुक्त राखेमुळे संपणार आहे. शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. भाजीपाला पिके, फळबाग यांचे या धुळीमुळे उत्पन्न कमी येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
– बाळासाहेब काळभोर, माजी सदसय, लोणी काळभोर ग्रामपंचायत
मालधक्क्याच्या परिसरातील पोल्ट्रीमधील कोंबड्या, तळ्यातील मासे ही या राखेमुळे मृत पावत आहेत. राख पिकांच्या पानावर जाऊन बसल्याने प्रकाश संश्लेषण न झाल्याने पिकांची वाढ होत नाही. त्यामुळे उत्पादन कमी होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
– इंद्रभुज काळभोर, माजी सदस्य, लोणी काळभोर ग्रामपंचायत