मंचर – श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील मंदिर हे देशातील सहावे ज्योतिर्लिंग आहे. ते कोणीही हिरावू शकणार नाही. केवळ भाविकांच्या मनामध्ये संभ्रम करायच्या उद्देशानेच आसाम सरकारने केलेल्या कृतीचा खेड-आंबेगाव तालुक्यातील विविध मान्यवरांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.
बारा ज्योतिर्लिंग श्लोक, शिवलीलामृत ग्रंथ, शिवपुराण यांच्या दाखल्यांनुसार बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर हे महाराष्ट्रातील खेड तालुक्यात आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेले पुणे जिल्ह्यातील हे एकमेव ठिकाण असून, या वादावर जिल्ह्यातील स्थानिक प्रतिनिधी देखील नाराज आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही हीच भमिका आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी केलेल्या या दाव्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात येत आहे.
– ऍड. सुरेश कौदरे, अध्यक्ष, भीमाशंकर देवस्थान
भीमाशंकर ज्योतिर्लिंग आसाममधे असल्याचे आसाम सरकारचे म्हणणे आहे; परंतु याबाबत कोणतीही धार्मिक वा ऐतिहासिक पुरावे दिलेले नाहीत. भीमाशंकर हे भीमानदीच्या तीरावर आहे आणि भीमा नदी ही महाराष्ट्रात असन देशातील एकमेव आहे. भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंग हे धार्मिक आणि ऐतिहासिक धर्म आणि संदर्भ ग्रंथांमध्ये भीमाशंकर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे भीमाशंकर हे आसाममध्ये आहे हा खोडसाळपणाचा विषय असून राज्य सरकारने याबाबत कडक भूमिका घेतली पाहिजे.
कोणत्याही प्रकारचे ऐतिहासिक तज्ज्ञांचा कुठलाही पुरावा न देता आसाम सरकारने केलेला दावा खोटा आहे. आणि तो कुणीही मान्य करणार नाही. आपण एखाद्या धार्मिक क्षेत्राचे प्रतिरूप तयार करू शकतो; परंतु मूळ धार्मिक क्षेत्र हे त्याच ठिकाणी असते. शिर्डीची अनेक ठिकाणी प्रतिशिर्डी देवस्थाने झाली;
परंतु मुळ शिर्डीचे महत्त्व कमी झाले नाही, तसेच मूळ भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातच असून त्याचे प्रतिभीमाशंकर जरी केले तरीही मूळ भीमाशंकरचे महत्व कमी होणार नाही आसाम सरकारने भाविकांच्या भावना दुखावण्याचे काम केले आहे. या भूमिकेमुळे भा विक नाराज झाले आहेत
– ऍड. विकास ढगे पाटील, उपाध्यक्ष, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान
श्रीक्षेत्र भीमाशंकर हे मंदिर सहावे ज्योतिर्लिंग म्हणून देशासह जगात ओळखले जाते. त्याचे पावित्र्य कमी करण्याचा प्रयत्न आसाम सरकार करीत आहे, हे आम्ही कदापिही सहन करणार नाही
– सूर्यकांत बाबा धायबर, संस्थापक, अमरनाथ सेवा संघ
केवळ जाती धर्मामध्ये भांडणे लावून समाजामध्ये फूट पाडण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. त्याला खतपाणी घालण्याचे काम आता आसाम सरकारने सुरू केले आहे. भीमाशंकर मंदिर देवस्थान हे सहावे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. त्याची ओळख आणि त्याची महती आसाम सरकारने कितीही वेळा चुकीच्या पद्धतीने माहिती देऊन हिरावण्याचा प्रयत्न केला तर तो कादापिही सहन केला जाणार नाही
– सुभाषराव मोरमारे, माजी सभापती,पुणे जिल्हा परिषद
भीमाशंकर हे आमचे दैवत आहे. आदिवासी भागात असलेले मंदिर सर्व भाविकासाठी भूषणावह आहे. त्यावर जर आसाम सरकारने त्यांचच्या राज्यात भीमाशंकर मंदिर असल्याचा केलेल्या दावा हास्यास्पद आहे. तो सहन केला जाणार नाही. आसाम सरकारच्या चुकीच्या कृतीमुळे भीमाशंकर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आसाम सरकारने माफी न मागितल्यास तीव्र आंदोलन करू.
– मारुती लोहकरे, माजी सरपंच, कोंढवळ भीमाशंकर ग्रामपंचायत आणि उपाध्यक्ष, शरद सहकारी बॅंके