मंचर -विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि भंडारा या पाच जिल्ह्यांना ऊर्जा विभागाच्या 30 नोव्हेंबर 2022 च्या पत्रांमुळे कृषी पंपासाठी दिवसा वीज देण्याचा निर्देश शासनाने दिलेला आहे. त्याच धर्तीवर जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या बिबट प्रवण क्षेत्र असलेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी रात्रीऐवजी दिवसा अखंडित थ्री फेज वीज पुरवठा करावा, अशी मागणी विधानसभेत दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यातील बहुतांश भाग डोंगराळ असून त्यामध्ये घोड व कुकडी प्रकल्पांतर्गत डिंभे, माणिक डोह, पिंपळगाव जोगे, वडज, येडगाव, चिलेवाडी, चासक मान हे सिंचन प्रकल्प आहे. यामुळे या तालुक्यांमध्ये ऊस, केळी, द्राक्ष, डाळिंब अशी पिके घेतली जातात. बिबट्यांना लपण्यासाठी सुरक्षित निवारा आणि मुबलक पाण्याची उपलब्धता असल्यामुळे या भागांमध्ये बिबट्या व वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आढळून येत आहे.
या तालुक्यांना बिबट्याप्रवण क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी या बिबट्यांकडून मानवी हल्ले झाले आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतकरी जनतेला सुरक्षितता देण्यासाठी कृषी पंपांना रात्रीऐवजी दिवसा अखंडित थ्री फेज वीज पुरवठा करण्याची जनतेची मागणी असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.