एकाचवेळी सर्दी, थंडी, ताप, खोकला “व्हायरल’ने त्रस्त
मंचर : साकोरे (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 72 विद्यार्थी सर्दी, थंडी, ताप, खोकला याने आजारी पडले असून वातावरणातील बदल आणि व्हायरल इन्फेक्शनमुळे ही मुले आजारी पडली, असावीत असा अंदाज प्राथमिक आरोग्य उपकेंद्र साकोरे येथील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. आजारी सर्व मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून सर्व मुले उपचार घेऊन बरी झाली असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तुषार पवार यांनी सांगितले.
साकोरे येथे शुक्रवार, शनिवार (दि. 20, 21) या दोन दिवसांत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एकूण 72 विद्यार्थ्यांना अचानक थंडी, सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार झाले होते. मुले अचानक आजारी पडल्याने शिक्षक, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. याबाबत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र साकोरे येथील डॉक्टरांना माहिती मिळाली होती.
रविवारी सुट्टी असताना देखील केंद्रातील डॉक्टर आणि त्यांच्या पथकाने युद्ध पातळीवर सर्व मुलांची भेट घेऊन त्यांची आरोग्य तपासणी करत उपचार केले. सोमवारी (दि. 23) आजारी असलेल्या मुलांची चौकशी केली असता सर्व मुले उपचार घेउन पूर्णपणे बरी झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या घटनेची माहिती मिळताच गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे यांनी जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायत येथे भेट देऊन माहिती घेतली आणि डॉ. तुषार पवार, विस्तार अधिकारी सुरेश लवांडे, अधिकारी, कर्मचारी, आणि शिक्षक यांना योग्य सूचना केल्या.
यावेळी डॉ. जयसिंग मिरपगार, डॉ. संतोष बलकर, आरोग्य निरीक्षक भास्कर साबळे, दत्तात्रय भागवत, आरोग्य सेविका अनिता वाघुले, प्रदीप पडवळ, बाबाजी कडूसकर, पूनम बिडकर, आशा वर्कर कीर्ती मोढवे, अर्चना मोढवे आणि सर्व शिक्षक उपस्थित होते.
रिपोर्ट आल्यावरच कारण कळेल
एकाच वेळी मुले आजारी पडली असता त्यांची करोना चाचणी करण्यात आली. मात्र, यात कोणताही विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडला नाही. सद्यःस्थितीत यात्रा जत्रांचा हंगाम असल्याने अनेक मुले येथे जातात. शाळेमध्ये काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांचा आठवडे बाजार भरला होता. 26 जानेवारीनिमित्त विविध स्पर्धांसाठी मुले सरावानिमित्त एकत्र येत होते. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन होऊन मुले आजारी पडली असावीत, असा अंदाज डॉ. तुषार पवार, डॉ. जयसिंग मिरपगार, डॉ. संतोष बलकर यांनी व्यक्त केला आहे. मुलांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून त्याचे रिपोर्ट आल्यानंतर विद्यार्थी नक्की कशामुळे आजारी पडले, हे स्पष्ट होईल असेही डॉक्टरांनी सांगितले.