पुणे -“आरटीई’ प्रवेश अर्जांतील चुका दुरुस्त करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याची मागणी पालकांकडून प्राथमिक शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे. मात्र, यावर अद्याप अधिकाऱ्यांकडून काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही.
प्रवेशासाठी राज्यस्तरीय लॉटरी काढून पहिली फेरी राबविण्यात आली आहेत. यातील सुमारे 20 हजार प्रवेशांच्या जागा अद्यापही रिक्तच राहिल्या आहेत. बहुसंख्य पालकांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरताना चुका केल्या आहेत. रहिवाशी पत्त्याची माहितीही व्यवस्थित भरण्यात आलेली नाही. यामुळे या पालकांच्या मुलांना शाळांमध्ये प्रवेश घेण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. पहिल्या फेरीत या अर्जांचा विचारच झालेला नाही. प्रवेशाची दुसरी फेरी सुरू करण्यासाठी पालकांना अर्जांतील चुका दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत अधिकारी स्तरावर चर्चाच सुरु आहे. यावर बैठकाही झालेल्या आहेत. मात्र, अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे पालकांमध्ये नाराजी पसरली आहे.