पुणे – मालवाहतूक करताना अनेक ट्रकचालकांना करोनाची बाधा झाली. तर काहींनी जीवदेखील गमवला. या चालकांच्या परिवाराला सरकारकडून मदत मिळाली नाही. त्यातच सततची इंधन दरवाढ, इन्शुरन्स आदी बाबींचा फटका वाहतूकदारांना बसला आहे. त्यामुळे 28 जूनपासून देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केंद्र सरकारला निवेदन देण्यात येणार आहे. हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय वाहतूकदारांनी घेतला आहे.
मागील काही दिवसांपासून सातत्याने डीझेल दरात वाढ होत आहे. वाहतुकीचे दरदेखील त्या प्रमाणात मिळत नाहीत. यासह जीएसटी, दरवाढ आदीमुळे वाहतूकदारांना फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूकदारांकडून केंद्र सरकारला निवेदन देण्यात येणार आहे.
इंधनाचे दर जीएसटीच्या कक्षेत घेण्याची मागणी करत आहोत. यामुळे वाहतूक व्यवसाय वाचू शकणार आहे. इन्शुरन्स कंपन्यांकडून प्रीमिअममध्ये वाढ करण्यात येत आहे. याचा फटका रिक्षा, टॅक्सी, ट्रक, बस व्यावसायिकांना बसत असून, किमान पुढील 2 वर्षे ही आर्थिक घडी व्यवस्थित होईपर्यंत प्रीमियममधील वाढ कमी करावी.
याबाबत निर्णय न झाल्यास ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून देशात चक्का जाम करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली.