पुणे – सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचा आराखडा चुकीचा असल्याने त्यामुळे भविष्यात या रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढण्याची टीका होत आहे. त्यामुळे या आराखड्याबाबत संबंधितांकडून आलेल्या सूचनांचा विचार केला जाईल. त्यानुसार आवश्यक वाटल्यास योग्य ते निर्णय घेतले जातील, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या पुलाचा आराखडा तयार करताना सल्लागारांकडून नेमकी काय स्थिती लक्षात घेऊन तो केला आहे. याबाबत पुन्हा अवलोकन करून पुढील निर्णय घेतले जातील, असेही ते म्हणाले.
तीन सिग्नलच वाचणार?
महापालिकेकडून सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता नसल्याने राजारामपूल ते फनटाईम सिनेमापर्यंत हा पूल उभारण्याचा निर्णय घेतला होता. या 2 किलोमीटरच्या रस्त्यात राजारामपूल, विठ्ठलवाडी, हिंगणे, संतोष हॉल, माणिक बाग तसेच पुढे गंगा भाग्योदय चौक असे सहा सिग्नल आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात पूल झाल्यानंतर हे सहा सिग्नलचा त्रास वाचणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात हा पूल फनटाईमऐवजी गंगा भाग्योदयपासून ते विठ्ठलवाडी चौकाच्या अलीकडेच उतरणार आहे. त्यामुळे केवळ संतोष हॉल, हिंगणे तसेच माणिक बाग येथील तीनच सिग्नल कमी होणार आहेत. तर, हा उड्डाणपूल विठ्ठलवाडी चौकात जिथे संपणार आहे त्या ठिकाणी विश्रांतीनगरकडून मुख्य रस्त्यावर येणारी वाहतूकही एकत्र येणार असल्याने या चौकात बॉटल नेक स्थिती होणार आहे. त्यामुळे हा पूल चुकला असून भविष्यात तो कोंडी वाढविणारा ठरेल ही बाब लक्षात घेऊन त्याचा आराखडा बदलण्याची मागणी केली जात आहे.