पुणे – महापालिका निवडणुकांसाठी शुक्रवारी रात्री जाहीर झालेली अंतिम प्रभाग रचना अखेर राष्ट्रवादीच्याच पथ्थ्यावर पडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. प्रभाग रचनेच्या कच्च्या आराखड्यावर आलेल्या हरकती आणि सूचनांनंतर त्यात फारसे बदल झालेले नाहीत.
महापालिका निवडणुकांची प्रभाग रचना या निवडणुकीत चांगलीच वादग्रस्त ठरत आली आहे. कच्ची प्रारूप रचना करण्याचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भाजपने या रचनेत मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप केल्याचा दावा राष्ट्रवादीच्या शहर पदाधिकाऱ्यांनी करत वरिष्ठ नेत्यांकडे धाव घेतली होती. त्यानंतर मात्र प्रभाग रचनेत थेट मुंबईतून बदल झाल्याची चर्चा सुरू झाली. तर, प्रत्यक्षात प्रारूप प्रभाग रचना जाहीर होताच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी “राष्ट्रवादी कॉंग्रेस थेट 122 जागा जिंकू शकते’ असे सांगत या निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला. यामागे प्रामुख्याने भाजपने जवळपास 15 ते 20 विद्यमान नगरसेवक तीन सदस्यांच्या प्रभागामुळे समोरासमोर आल्याचे कारण होते.
तर, प्रभाग रचनेत अनेक प्रभाग भाजपला अडचणीचे ठरणारे होते. त्यानंतर भाजपनेही हरकती आणि सूचनांमधून प्रभाग रचना चुकीची असल्याचे सांगत मोठ्या प्रमाणात हरकती घेतल्या होत्या. मात्र, त्यानंतरही प्रभाग रचनेत मोठा बदल झालेला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरळसरळ ही प्रभाग रचना राष्ट्रवादीच्या पथ्थ्यावर पडल्याची चर्चा आहे.
शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत प्रभाग 33 मधील बावधनचा भाग वगळून तो प्रभाग 32 मध्ये जोडण्यात आला आहे. तर प्रभाग 12 मधील औंधचा काही भाग प्रभाग 23 बाणेर-सुस-बालेवाडीला जोडण्यात आला आहे. याशिवाय प्रभाग 42 चा काही भाग वगळून तो प्रभाग 41 मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. प्रभाग 33 मधून विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ इच्छूक असून त्यांचा प्रभाग सर्वांत विचित्र असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता त्यांच्या प्रभागातील काही भाग वगळण्यात आला आहे. तर, ज्या प्रभागांमध्ये भाजपचे विद्यमान नगरसेवक समोरासमोर येत होते त्यापैकी एकाही प्रभागात बदल झालेला नाही.
महाविकास आघाडीत अडचणी वाढणार
प्रारूप प्रभाग रचनेत फारसा बदल झालेला नसल्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीलाही फटका बसण्याची शक्यता आहे. या दोन्ही पक्षांचे उमेदवार जवळपास 25 ते 28 जागांवर आमने-सामने येण्याची शक्यता आहे. याशिवाय शिवसेनेलाही काही जागा द्याव्या लागणार असल्याने महाविकास आघाडीलाही तिकीट वाटपात अडचणींचा सामना करावा लागणार आहे.