पुणे- इयत्ता अकरावीच्या “प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य’ या फेरीअंतर्गत प्रवेशासाठी 21 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
इयत्ता अकरावी प्रवेशाच्या नियमित तीनसह एक विशेष फेरीही घेण्यात आली. त्यानंतर “प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य’ ही फेरी सुरू करण्यात आली होती. त्याची मुदत 18 ऑक्टोबरपर्यंत होती. मात्र, काही विद्यार्थ्यांना आपला प्रवेश रद्द करावयाचा आहे. काहींनी अद्याप ऑनलाइन अर्ज भरलेले नाहीत. प्रवेशासाठी सर्व विद्यार्थ्यांना संधी मिळावी, यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे परिपत्रकही माध्यमिमक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी जारी केले आहे.
विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी गुरुवारी (दि.21) दुपारी 12 पर्यंत, तर प्रवेश निश्चित करण्यासाठी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदत आहे. या वाढीव कालावधीत इयत्ता दहावी उत्तीर्ण असलेले सर्व व एटीकेटीचे विद्यार्थी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश वेळेमध्ये निश्चित करणे गरजेचे आहे. दहावीच्या पुरवणी परीक्षमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाबाबत पुरवणी परीक्षेच्या निकालानंतर निर्णय घेण्यात येणार आहे.
पुणे विभागात 41 हजार जागा रिक्त
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत 317 कनिष्ठ महाविद्यालयांत 1 लाख 13 हजार 325 प्रवेशाच्या जागा आहेत. यासाठी 89 हजार 687 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील 82 हजार 608 जणांचे अर्ज लॉक झाले. 82 हजार 423 अर्जांची पडताळणी झाली आहे. 64 हजार 204 विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रमही नोंदविले आहेत. आतापर्यंत 71 हजार 893 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. अद्यापही 41 हजार 432 प्रवेशाच्या जागा रिक्त आहेत.