पुणे –शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण विभागाने घेतला आहे. आरटीई सोडतीमध्ये प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी बुधवारी शेवटचा दिवस होता. आता 29 एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करता येणार आहे. दरम्यान, आतापर्यंत आरटीई प्रवेशअंतर्गत निम्मेही प्रवेश झाले नसल्याचे दिसून येत आहे.
आरटीईअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी राज्यातील 9 हजार 86 शाळांमध्ये 1 लाख 1 हजार 906 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी 2 लाख 82 हजार 783 विद्यार्थ्यांनी अर्ज केले. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने काढलेल्या सोडतीमध्ये 90 हजार 685 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आले. तर प्रतीक्षा यादीत 69 हजार 859 विद्यार्थी आहेत. सोडतीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 20 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र आतापर्यंत प्रवेश प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत प्रवेश प्रक्रियेत 36 हजार 500 विद्यार्थ्यांचेच प्रवेश झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, काही जिल्ह्यांतील पालक, संस्था आणि लोकप्रतिनिधींनी आरटीई प्रवेशांसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर आरटीई प्रवेशांसाठी 29 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.
रहिवासी पुरावा म्हणून 11 महिन्यांचा भाडेकरार चालणार
आरटीईअंतर्गत लॉटरीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये रहिवासी पुरावा म्हणून 12 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीच्या नोंदणीकृत भाडेकराराऐवजी 11 महिन्यांचा भाडेकरार ग्राह्य धरण्याबाबत संचालनालयाला निवेदने प्राप्त झाली आहेत. त्याचप्रमाणे याबाबत दूरध्वनीद्वारे ही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार 11 महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरार नोंदणीकृत भाडेकरार ग्राह्य धरण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे. हा भाडेकरार ऑनलाइन अर्ज भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा पाहिजे, असे टेमकर यांनी स्पष्ट केले आहे.