आरोग्य विभागाची परीक्षा अचानक पुढे ढकलल्याने सरकारवर टीका
मंत्री आणि प्रशासनाने कंपनीवर फोडले खापर
निराश उमेदवारांना घरी परत जाण्याची नामुष्की
पुणे – राज्यातील आरोग्य विभागाच्या गट “क’ व गट “ड’ संवर्गातील 6,205 पदांची परीक्षा दि. 25 आणि 26 रोजी घेण्यात येणार होती. या परीक्षेच्या शेकडो उमेदवारांच्या प्रवेशपत्रात गंभीर चुका झाल्या. त्यामुळे उमेदवारांना महाराष्ट्राबाहेरील अन्य राज्यातील परीक्षा केंद्र देण्यात आली होती. हा गोंधळ उघड झाल्याने तत्काळ परीक्षाच पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने शुक्रवारी रात्री अचानक घेतला. या सर्व प्रकाराने राज्यभरातील उमेदवारांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. परीक्षेबाबतच्या गोंधळाचा उमेदवारांकडून तीव्र संताप व्यक्त करत शासनाचा निषेध करण्यात आला आहे.
आरोग्य विभागाची या लेखी परीक्षेसाठी हजारो उमेदवारांनी अर्ज भरले होते. ही परीक्षा घेण्यासाठी न्यासा कन्युनिकेशन प्रा.लि. कंपनीची नियुक्तीही शासनाने केली. परीक्षेसाठी उमेदवारांना दूरच्या शहरी व ग्रामीण भागातील केंद्रे देण्यात आली होती. काही विद्यार्थ्यांना अन्य राज्यातील केंद्र मिळाली होती. उमेदवारांच्या नाव, पत्यातही गंभीर चुका झाल्या. विद्यार्थी हजारो रुपये खर्च करुन परीक्षा केंद्राजवळ पोहोचले होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री विद्यार्थ्यांना परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याबाबतचे एसएसएस आले.
कंपनीचे अपयश
संबंधित परीक्षा घेणाऱ्या न्यासा कम्युनिकेशन कंपनीबरोबर करारही झाला आहे. त्यानुसार प्रश्नपत्रिका संच उपलब्ध करून देणे एवढीच जबाबदारी आरोग्य विभागाची होती. इतर सर्व जबाबदारी कंपनीवरच सोपवण्यात आली होती. अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना प्रवेश पत्र देण्यास व आवश्यक बैठक व्यवस्था करण्यास कंपनी अपयशी ठरली.
ब्लॅकलिस्टेड कंपनीला काम दिलेच कसे?
गेल्या काही वर्षांपूर्वी काही राज्यात झालेल्या परीक्षांमधील गलथान कारभारामुळे “न्यासा कम्युनिकेशन’ कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा त्यास कंपनीला राज्य शासनाने काम कसे काय दिले? असा प्रश्नही उपस्थित करण्यात येऊ लागला आहे. या कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणीही होऊ लागली आहे.
राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या हेतूने विविध रिक्त जागा भरण्यासाठी पाठपुरावा करुन मान्यता मिळवली आहे. संबंधित परीक्षा घेणारी “न्यासा’ कंपनी ही असमर्थ व अकार्यक्षम ठरल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कंपनीने असमर्थता दाखवल्यामुळे उमेदवारांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करत माफी मागतो. येत्या दहा दिवसांत परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात येणार आहे.
– राजेश टोपे, आरोग्यमंत्री