सेवा कधी उपलब्ध होणार? : चाकरमान्यांचा सवाल
पुणे – मागील वर्षी मार्च महिन्यात करोनामुळे रेल्वेची प्रवासी सेवा बंद झाली. मात्र आता वर्ष झाले तरी नियमित प्रवासी सेवा सुरू झाल्या नाहीत. लोकललादेखील सर्वसामान्यांना अद्यापही प्रवासास मुभा दिलेली नाही. त्यामुळे लोकल आणि डेमू सेवा सुरू करण्याची मागणी अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांतून करण्यात येत आहे.
मागील वर्षी 22 मार्चपासून रेल्वेची प्रवासी ठप्प झाली. त्यानंतर रेल्वेने श्रमिक आणि विशेष गाड्या टप्प्याटप्प्याने सुरू केल्या. याशिवाय नियमित धावणाऱ्या गाड्यादेखील विशेष म्हणून सोडण्यात येत आहेत. मात्र आता वर्ष झाले तरी नियमित प्रवासी गाड्या सुरू झाल्या नाहीत.
कामानिमित्त नियमित ये-जा करणाऱ्या प्रवाशांना आर्थिक भुर्दंडासह मनस्तापदेखील सहन करावा लागत आहे. त्यामुळे नियमित रेल्वे प्रवासी सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.
करोनामुळे रेल्वे आणि प्रवाशाचेही नुकसान झाले. आता रेल्वेसेवा पूर्ववत व्हावी, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे नियमित लोकल, एक्स्प्रेस, पॅसेंजर, डेमू या गाड्या लवकरात लवकर सुरू व्हाव्यात. उत्सव आणि विशेष गाड्यांऐवजी नियमित गाड्या सुरू कराव्यात. मुंबई, दौंड, लोणावळा, सातारा या गाड्या सुरू व्हाव्यात. याशिवाय पास किंवा जनरल तिकीट उपलब्ध केल्यास प्रवाशांना दिलासा मिळेल.
– हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप