पुणे – राज्यात दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यापासून परळी औष्णिक वीजनिर्मिती केंद्र सुटलेले नाही. पाणी उपलब्ध होत नसल्याने येथील वीजनिर्मिती ठप्प झाली आहे. त्यावर उपाय म्हणून सध्या बोअरवेल आणि विहिरीचे पाणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामाध्यमातून दररोज अडीचशे मेगावॅट वीजेची निर्मिती होत आहे.
परळी (जि. बीड) येथील औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पात पाच वीज संचाच्या माध्यमातून 1 हजार 170 मेगावॅट वीजनिर्मिती होते. यासाठी जायकवाडी आणि माजलगांव धरणामधून खडका बॅरेजमध्ये पाणी आणले जाते. मात्र, सध्या खडका बॅरेजमध्ये दहा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. तसेच येथील आठ क्रमाकांच्या संचातून होणारी वीज स्वस्त आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून खडका बॅरेजमधून दररोज 30 लाख लिटर तर विहिर, बोअरवेल आणि राखेतून पाझरणाऱ्या सुमारे वीस लाख लिटर पाण्यावर आठ क्रमाकांचा संच चालविण्यात येत आहे. ही वीज राज्याच्या मागणीच्या तुलनेत किरकोळ असली तरीही अंतर्गत जलस्रोताच्या माध्यमातून मिळणाऱ्या पाण्याच्या मदतीने प्रथमच करण्यात आलेला प्रयोग यशस्वी झाला आहे, असा दावा महनिर्मिती कंपनीचे संचालक (संचलन) चंद्रकांत थोटवे यांनी केला आहे.
बोअरवेलची करणार दुरुस्ती
परळी औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प तब्बल अडीचशे एकर जागेवर आहे. दुष्काळी परिस्थितीत या परिसरात भीषण पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे त्याचा परिणाम वीजनिर्मितीवर होत असतो. त्यावर पर्याय म्हणून महानिर्मिती कंपनीने याठिकाणी बोअरवेल घेतले होते. मात्र, या बोअरवेलची दुरुस्ती होऊ शकली नव्हती. त्यामुळे त्याचा जलस्रोतावर परिणाम होत होता. यंदा पाणीटंचाई जाणवू लागल्यानंतर प्रशासनाने या बोअरवेलची दुरुस्ती केली असून आगामी काळात त्याची सातत्याने देखभाल आणि दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.