पुणे -लॉकडाऊन काळात वाढलेल्या खाद्यतेलाच्या भावात काहीशी घसरण झाली आहे. जागतिकसह स्थानिक बाजारपेठेत तेलाची आवक वाढली आहे. त्यामुळे ही घट झाली आहे. घाऊक बाजारात 15 लिटरच्या डब्यामागे 200 ते 250 रुपयांची घट झाली. तर, किरकोळ बाजारात प्रति लिटरच्या भावात 10 ते 15 रुपयांनी घट झाली. त्यामुळे हे भाव काही प्रमाणात सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत.
“करोनाचा बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे भावात वाढ झाली होती. आता आवक वाढली आहे. त्यामुळे भावात घट होत आहे. मात्र, यापुढे खाद्यतेलाच्या भावात घट होईल, अशी परिस्थिती नाही. त्यामुळे हेच भाव काही दिवस टिकून राहतील,’ असे व्यापारी रायकुमार नहार यांनी सांगितले.
सर्वत्र चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे खाद्यतेलाला ग्राहकांकडून होणारी मागणीही चांगली असल्याचे नहार यांनी सांगितले. शेंगदाणा तेलाचे भाव मागील काही दिवसांपासून टिकून आहेत. शेंगदाणा तेलाचे उत्पादन राज्यातच होते. तसेच सूर्यफूल आणि पाम तेलाचेही उत्पादन काही प्रमाणात राज्यातच होते. मात्र, सोयाबीन तेलाची इतर देशांतून आयात होते. सद्य:स्थितीत इंडोनेशिया, मलेशिया, रशिया आणि स्वित्झर्लंड या देशांतून सूर्यफूल, पाम आणि सोयाबीन तेलाची आयात होते, असेही नहार यांनी सांगितले.