पुणे : धरणांच्या पाण्याने तळ गाठल्याने शहरावर पाणीकपातीची वेळ ओढावली आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक असताना, ठेकेदारामार्फत सुरू असलेल्या विकासकामांसाठी चक्क पिण्याचे पाणी अन् तेही अमर्यादित वापरले जात असल्याचे समोर आले आहे. विठ्ठलवाडीतील स्मशानभूमीच्या मागील नाल्यावर कल्व्हर्टचे काम सुरू असून, या कामासाठी महिनाभरापासून अनधिकृत नळजोड घेऊन पिण्याचे पाणी वापरण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, येथून काही अंतरावर महापालिकेची आरोग्य कोठी आहे. या कामाच्या पाहणीसाठी महापालिकेच्या पथ विभागाचे अभियंतेही अनेकदा येऊन गेले आहेत. मात्र, त्यांच्याकडून या प्रकाराकडे सोयीस्कर दूर्लक्ष करण्यात आले. अशीच स्थिती शहरातील इतर बांधकामांच्या ठिकाणीही आहे. एका बाजूला बांधकाम व्यावसायिकांना शुद्ध केलेले पाणी वापरणे बंधनकारक करण्याचा विचार महापालिका करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र, अशा प्रकारे पालिकेच्या विकासकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.
विशेष म्हणजे अनधिकृत नळजोड घेऊन हे पाणी वापरले जात आहे. पालिकेच्या विकासकामांसाठी शुद्ध केलेले सांडपाणी अथवा इतर जलस्त्रोतातील पाणी वापरावे, असे आदेश ठेकेदारांना दिले आहेत. असे असताना अनेक ठिकाणी पालिकेच्या जलवाहिन्यांना टॅप घेऊन चक्क पिण्याचे पाणी तासन्तास वापरले जात आहे. तसेच आवश्यकता नसतानाही हे नळ सुरू करून बांधकामांवर पाणी सोडले जात आहे.
पाणी पुरवठा विभाग कधी जागा होणार?
शहरात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय सुरू आहे. त्यात, वॉशिंग सेंटर, हॉटेल, बांधकामे, उद्याने, शासकीय कार्यालये, खासगी बांधकामे, जलतरण तलाव, स्वच्छतागृहे अशा अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या अपव्यय राजरोसपणे सुरू आहे. मात्र, महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागास हे प्रकार दिसण्यास तयार नाहीत. वास्तविक पाहता शहरासाठीचे हे पाणी वाया जात असल्याने पालिकेने वर्षभर अशा चुकीच्या वापरावर कारवाई करणे, त्यासाठी धोरण ठरवणे आवश्यक आहे. मात्र, या विभागास केवळ पाणी पुरवठयाची थकबाकी वसुली आणि शहरात पाणी मीटर बसविण्याची घाई झालेली आहे. शहरात पाण्याची भिषण स्थिती उद्भवली असताना आता तरी पाणी पुरवठा विभाग जागा होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
संकट गडद, तरीही…
येत्या सोमवारपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा
यासाठी महापालिका प्रशासनाचे नियोजन पूर्ण
धरणात पाणी कमी असल्याने पाण्याचा अपव्यय थांबविणे आवश्यक
एकीकडे पुणेकरांना पाणी बचतीचे आवाहन, तर दुसरीकडे महापालिकेकडूनच उधळपट्टी