पुणे : काँग्रेस पक्षाचे भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आत्मघातकी आणि चुकीचा संदेश जाईल, असा कोणताही निर्णय घेऊ नये. थोपटे यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपात जाण्याचा निर्णय घेऊ नये, अशी अपेक्षा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली.
संग्राम थोपटे यांनी काँग्रेसच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. हर्षवर्धन सपकाळ हे पुणे दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. अनंतराव थोपटे हे महाराष्ट्राचे स्वाभिमानी नेतृत्व असून ते ज्येष्ठ नेते आहेत. अनंतराव थोपटे यांच्या परिवारामध्ये संघर्षाचा वारसा आहे आणि तोच वारसा संग्राम थोपटे यांनी जोपासला पाहिजे, असे मत सपकाळ यांनी व्यक्त केले आहे.
विधानसभा अध्यक्ष पदासाठी संग्राम थोपटे यांचे नाव अंतिम झाले होते.
अध्यक्षपदापर्यंत भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जाऊ दिले नाही. तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर दबाव आणून विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक जाहीर करून दिली नाही. त्यामुळे संग्राम थोपटे हे विधानसभा अध्यक्ष होऊ शकले नाहीत, असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले.
विधानसभा अध्यक्ष पद रिक्त असल्यामुळे त्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचे काम झाले. त्या काळात संग्राम थोपटे हे विधानसभा अध्यक्ष झाले असते तर हे सर्व टाळले असते. पण, यात भाजपने राजकारण केले. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे आणि संग्राम थोपटे यांचे नुकसान केले आहे. त्यामुळे संग्राम थोपटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कोणत्याही आश्वासनांना बळी पडू नये, असा सल्लाही सपकाळ यांनी दिला आहे.