पेठ वार्ताहर: सातगाव पठार ता आंबेगाव भागात परतीच्या पावसाने शेत पिकांचे मोठे झालेले नुकसान झाले आहे. पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी पेठ येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या नुकसानीची पाहणी केली आहे. त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांनी त्वरित शेत पिकांचे पंचनामे करावेत अशे आदेश म्हैसकर यांनी दिले.
अतिवृष्टीने बाधित असलेल्या आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागाचा पाहणी दौरा दि 6 रोजी 12 वाजता डॉ म्हैसकर यांनी केला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, तहसीलदार रमा जोशी, गट विकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका कृषी अधिकारी टी.के.चौधरी, कृषी सहायक व्ही. एच. मिडघुले उपस्थित होते.
डॉ. म्हैसकर यांनी पेठ येथील सुरेश धोंडिबा धुमाळ आणि जयंत काशिनाथ थिटे, नामदेव रासकर यांच्या शेतातील बटाटा, कांदा, मका या पिकांची पहाणी केली. यावेळी पावसाचे पाणी शेती परिसरात साचल्याने मका, बाजरी, कांदा, लसूण, कोथिंबीर, पालेभाज्या, आंबा, कारले, ज्वारी, हरभरा या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याची पाहणी केली.
शेतात काबाडकष्ट करून कधी शेतमालाला बाजार भाव मिळत नाही. तर कधी अवकाळी पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे मोठा भांडवली खर्च व मेहनत करूनही कष्टकरी शेतकऱ्यांच्या हाताला काहीही लागत नाही. त्यातच आता निसर्गाच्या लहरीपणामुळे सततच्या कोसळणाऱ्या धारांनी बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे.
ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. मात्र हीच शेती आता अडचणी येऊ लागल्याने शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ढासळणार हे नक्की आहे. त्यामुळे मायबाप सरकारने वेळीच यावर उपाययोजना करण्याची मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर केली. यावेळी कृषिसहायक पी. बी. ढेंगळे, तलाठी हेमंत भागवत, कोतवाल संदीप तोत्रे आदी उपस्थित होते .