वेल्हे – राजगड हा तालुका दुर्गम असला तरी गेल्या ५० वर्षांत इथे मूलभूत विकासाची काम झालेली नाहीत. रस्ते, पाणी, वीज या सुविधा अजूनही नागरिकांपर्यंत पोहोचल्या नाहीत. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे राजगड तालुका विकासापासून वंचित राहिला आहे. या तालुक्याच्या विकासासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी दिली.
महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मांडेकर यांनी मंगळवारी राजगड तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या. यावेळी मांडेकर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी रेवनाथ दारवटकर, रणजित शिवतरे, भगवान पासलकर, किरण राऊत, निर्मला जागडे, कीर्ती देशमुख, संगिता जेधे, संदीप खुटवड, अण्णा देशमाने, राजू रेणुसे, सुनील शेंडकर, कुंदन गंगावणे हे महायुतीतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मांडेकर म्हणाले की, चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक संस्था तालुक्यात नसल्याने इथल्या मुलांना शिक्षणासाठी गाव सोडावा लागतोय. मतदारांनी संधी दिल्यास तालुक्यात शैक्षणिक संस्था उभारण्यास प्राधान्य दिले जाईल. कोणताही पक्षपात न करता मतदार संघासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून घेऊन विकास करणार आहे.