गृहमंत्र्यांच्या मतदार संघात संजय राऊत यांची पत्रकार परिषद
“एसपीएल’च्या उद्घाटनाला लांडेवाडीत उपस्थिती
संतोष वळसे पाटील
मंचर – अजान आणि भोंग्यावरून राज्यात राजकीय भोंगेबाजी चालू असताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव विधानसभा मतदार संघात शुक्रवारी (दि. 6) शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ खासदार संजय राऊत येणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे यांचा कसा समाचार घेतात आणि ते काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे शिवसंग्राम प्रीमियर लीगचे आयोजन करून तेथे क्रिकेटचा महासंग्राम सुरू केला आहे. यानिमित्ताने शिवसेना नेते संजय राऊत येणार असल्याने येथील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व मनसेचा ते कसा समाचार घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीच्या मागे ईडी, सीबीआयच्या धाडी, त्यातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींसमोरील अजानचे भोंगे बंद करा अन्यथा हनुमान चालीसा लावणार… यावरून आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने निवडणूक लांबविण्याचा प्रयत्न केला; पण न्यायालयाने दोन आठवड्यांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिल्याने निवडणुकाही अटळ आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचा मंचर- लांडेवाडी दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
सत्ताधारी-विरोधकांत आरोपांची भोंगेबाजी
राज्यात सध्या मोठी राजकीय धुलवड सुरू आहे. शिवसेनेचे आक्रमक नेते खासदार संजय राऊत महाविकास आघाडीच्या वतीने भाजपच्या विरोधात किल्ला लढवत आहेत. त्यातच राज्यातील भोंगे-हनुमान चालीसावरून मनसे आक्रमक झाल्याने राज ठाकरे यांनी सभांमधून मुख्यमंत्री व आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केल्याने वातावरण चिघळले आहे.
वेळप्रसंगी शेलक्या भाषेत समाचार घेत असल्याने सध्या शिवसेनेचे नेते म्हणून राऊत पुढे आले आहेत. याच संधीचा फायदा घेण्यासाठी व राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांचा लांडेवाडी दौरा महत्त्वाचा मानला जातो आहे.
आढळरावांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद
आढळराव पाटील यांच्या लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील निवासस्थानी शुक्रवारी (दि. 6) सायंकाळी 6 वाजता संजय राऊत यांची पत्रकार परिषद होणार आहे. राज्यात भाजप आणि मनसेने सत्ताधारी महाविकास आघाडीवर अनेक भ्रष्टाचार केल्याचे आरोप करीत रान उठविले आहे. त्यात संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत विरोधकांवर पलटवार होणार असल्याने शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.