मुकुंद ढोबळे
शिरूर- शिरूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे स्वप्न सदस्यांना पडले आहे. तर आपल्याच पॅनलचा कारभारी नियुक्त व्हावा यासाठी पॅनलप्रमुख विरोधी पॅनल, अपक्ष उमेदवारांना रोख लाखो रुपायां मोठमोठ्या चीज भेटवस्तूंचे आमिष दाखवत “कारभारीसाठी’ कायपण करण्याची तयारी दर्शवली आहे. तर अनेकजण पॅनलप्रमुख आणि राजकारण्यांच्या घरांचे उंबरठे झिजवण्यात मग्न आहेत.
शिक्रापूर ग्रामपंचायच्या आरक्षणावरून आरक्षणावरून घोळ सुरू असून सत्ता येऊनही सरपंचपद विरोधी गटाकडे गेले म्हणून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली यामुळे तालुक्यातील उर्वरीत ग्रामपंचायतींचे सरपंच उपसरपंचपदाची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. आर्थिक दृष्या सक्षम आणि नावजलेल्या सणसवाडी, कोरेगाव भीमा या ग्रामपंचायतमध्ये आमिषांची मोठी उलाढाल रंगली आहे.
शिरूर तालुक्यात नुकतीच 71 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका पार पडल्या. यात अनेक ग्रामपंचायतींमचे सरपंचपद काठावर अडकले आहे. गावच्या सत्तेच्या चावी आपल्या हातात हवी आहे, त्यासाठी पॅनल प्रमुख, कार्यकर्ते फोडाफोडी, पळवापळवीचे राजकारण जोरात रंगले आहे. गावात माझीच सत्ता यावी यासाठी “कायपण’ करण्याची तयारी असून त्यादृष्टीने अनेक गावात “याला गाड, त्याला गाड’ची प्रवृत्तीही जोपासली जात आहे.
कोणाची तरी “जिरवायाची’ यासाठी जमिनीचा तुकडा विकून तर सावकाराकडून कर्ज घेऊन “उनमात’ सुरू आहे. अनेक गावात निवडून आलेले सदस्यांना आपल्या पॅनलकडे खेचून आणण्यासाठी उपसरपंचपदाच्या भुरळीसह विविध आमिषेही दाखवली जात आहेत.
मतासाठी 1 ते 10 लाखांचा भाव
शिरूर तालुक्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये आजी माजी आमदारही लक्ष ठेवून सूत्र हालवित आहेत. तर सरपंचपद आपल्या गटाकडे खेचण्यासाठी आपल्या उमेदवाराला मतदान करावे यासाठी एका मताला एक ते दहा लाखांचा भाव आला असून अनेक ठिकाणी मोठमोठी वाहने भेट देण्याचेही आमिष दाखवण्यात आले आहे.
सूत्र हलविणारे गट सक्रिय
शिरूर तालुक्यातील निवडणूक पार पडलेल्या 71 गावांपैकी अनेक गावांत सरपंच कोण होणार यासाठी पैजा लागल्या असून कोणत्या गावात कारभारीपदाला कितीचा भाव आला, मग आपल्या गावात काय भाव तो कमी करायचा की तो वाढवायचा यासाठी विविध स्तरातून सूत्र हालविणारे गट जोरदरा सक्रीय झाले आहेत.
अनेकांच्या डिल फिक्स, अनेक रकमेसाठी अडले
सरपंचपदासाठी आपल्या बाजूने मतदान करण्यासाठी आमिषे दिली असून काही जणांचे बळी पडले आहे. या निवडणुकीपर्यंत कोणाचा दबाव नको म्हणून अनेक नवनिर्वाचित सदस्य थेट सहलीला गेले आहेत. तर अनेक जण घरात बसून गोळाबेरजेच्या राजकारणा बरोबरबरच विरोधी सदस्य गळाला कसा लागेल यासाठी सापळा रचण्यात गुंग आहेत. तर अनेकांच्या “डिल फिक्स’ झाले असून आम्ही कोणाच्या आमिषाला बळी पडणार नाही असे खोटे अवसान आणण्याचा प्रयत्न ही करीत असून अनेक जण रक्केमेवर अडून बसले आहेत.